@maharashtracity

परिवहन विभाग २,११०.४७ कोटीने तोट्यात

वीज विभागही १२६.०१ कोटीने तोट्यात

सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्पही १,८१८ कोटी रुपये तुटीचा होता

भांडवली खर्चासाठी ६९५.१८ कोटींची तरतूद

मुंबई: बेस्ट उपक्रमाचा सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षासाठीचा तब्बल २,२३६ कोटी ४८ लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ८ ऑक्टोबर रोजी बेस्ट समितीच्या बैठकीत अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांना सादर केला. (BEST presented deficit budget worth Rs 2236 crores)

या अर्थसंकल्पात, बेस्ट परिवहन विभागाची तूट तब्बल २,११० कोटी ४७ लाख रुपये तर वीज विभागाची तूट १२६ कोटी १ लाख रुपये एवढी दर्शविण्यात आली आहे.

सन २०२१ -२२ चा अर्थसंकल्पही १,८१८ कोटी रुपये तुटीचा होता. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुटीमध्ये ४१८.४८ कोटी रुपयांची वाढ झाल्याचे निदर्शनास येते.

मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचे वातावरण आहे. त्यामुळे शासनाने काही प्रमाणात निर्बंध लादले होते. परिणामी अनेक कंपन्या बंद पडल्या तर कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि रोजगार बुडाले. त्याचा मोठा आर्थिक फटका इतर कंपन्यांप्रमाणेच बेस्ट उपक्रमालाही बसला आहे.

तसेच, दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढले आहेत. महागाई वाढली आहे. त्यातच बेस्ट उपक्रमाच्या ढिसाळ नियोजन पाहता त्याचा एकदरीत परिमाण म्हणजे बेस्ट उपक्रम हा कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक खोल खड्ड्यात रुतत चालला आहे.

बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग हा गेल्या काही वर्षांपासून कोट्यवधी रुपयांनी तोट्यातच आहे. बेस्टच्या उपक्रमाचे यंदाचे उत्पन्न अंदाजित ४ हजार ९९७ कोटी ४ लाख रुपये तर खर्च अंदाजित ७ हजार २३३ कोटी ५२ लाख रुपये इतका दाखविण्यात आलेला आहे.

त्यामुळे उत्पन्नापेक्षाही खर्च जास्त असल्यानेच बेस्ट उपक्रमाचा तोटा २ हजार २३६ कोटी ४८ लाख रुपये इतका दर्शविण्यात आलेला आहे.

यामध्ये, परिवहन विभागाचे यंदाचे उत्पन्न अंदाजे १ हजार ४५१ कोटी ६७ लाख रुपये एवढे दर्शविण्यात आले आहे. तर खर्च ३ हजार ५६२ कोटी १४ लाख रुपये दर्शवला आहे. त्यामुळे उत्पन्नापेक्षाही खर्च अधिक असल्याने परिवहन विभागाचा तोटा हा तब्बल २ हजार ११० कोटी ४७ लाख रुपयांच्या घरात गेला आहे.

वीज विभागाचे उत्पन्न ३ हजार ५४५ कोटी ३७ लाख रुपये दर्शविण्यात आले आहे. तर त्या तुलनेत खर्च वधारला असल्याने वीज विभागाचा एकूण खर्च हा ३ हजार ६७१ कोटी ३८ लाख रुपये दर्शविण्यात आला आहे.

त्यामुळे साहजिकच परिवहन विभागाप्रमाणेच वीज विभागही तब्बल १२६ कोटी १ लाख रुपये तुटीत गेला आहे.

वीजग्राहकांसाठी प्रीपेड व स्मार्ट वीजमापके

बेस्ट वीज विभाग यापुढील काळात, वीज पुरवठा सेवा ग्राहकांना अपेक्षित, सुलभ करणे व तक्रार निवारण प्रतिक्रियेचा कालावधी अधिकाधिक कमी करणे आणि ग्राहकांना दिलासा देण्यासाठी बेस्ट जालव्यूहाचे स्वयंचलन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देणार आहे.

ज्याअंतर्गत, प्रीपेड वीजमापकासहित स्मार्ट विजमापकांची संचमांडणी करणे, प्रगत वितरण व्यवस्थापन पध्दतीसहित ( एडिएमएस ) स्काडा पध्दती अवंलंबीत करणे, वितरण उपकेंद्रांचे स्वयंचलन आणि कॉलसेंटरसहित आउटेज व्यवस्थापन पध्दती ( ओएमएस ) आणि वाहन शोध कार्यपध्दतीचा अंतर्भाव असणार आहे, असे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे.

डिजीटल वीजदेयक प्रदान सुविधेचा विस्तार

बेस्ट उपक्रम वीजग्रहाकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असतो. बेस्ट पर्यावरणस्नेही आणि डिजीटल प्रदान सेवा वाढविण्यावर भर देणार आहे. वीज विभागाच्या साडेदहा लाख वीजग्राहकांपैकी ६५ % वीजग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज देयकाचे प्रदान करतात.

त्यामुळे बेस्ट वीज विभाग, ग्राहक यांच्या मुल्यवान वेळेची नुसतीच बचत होत नाही तर वाहतूक खर्चातही बचत होत आहे. यापुढे डिजीटल प्रदानाची सुविधा ८०% पेक्षा जास्त पातळीवर नेण्याकरिता बेस्टने डिजीटल प्रदान करणाऱ्यांना बक्षिस योजना सुरु केलेली आहे.

‘एसएमएस’ मार्फत वीज ग्राहकांना वीजदेयके पाठविणे सुरु केलेले आहे. आगामी काळात अन्य डिजीटल माध्यमे आणि वीज भरणा केंद्रे बँकांच्या शाखामार्फत विस्तारित करणे मुख्य केंद्रस्थानी असेल, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

इलेक्ट्रिक बससेवेला प्राधान्य

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या ई- व्हेहिकल धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आणि शहरातील वायु प्रदूषण, ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी बेस्ट उपक्रम यापुढे केवळ इलेक्ट्रिक बसगाडयांचा वापर करणार आहे. (priority to e- vehicles)

प्रवाशांना उत्तम दर्जाची व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी बेस्ट आपल्या बसताफ्यात भाडेतत्वावरील २१०० इलेक्ट्रिक बसगाडया समाविष्ट करणार आहे. यामध्ये १४०० एकमजली वातानुकुलीत ४०० मिडी वातानुकुलीत व १०० मिनी वातानुकुलीत व २०० दुमजली इलेक्ट्रिक बसगाडयांचा चालकासहीत समावेश असणार आहे.

त्यामुळे मार्च २०२३ पर्यंत बेस्टचा ५०% बसताफा व मार्च २०२७ पर्यंत १००% बसताफा हा इलेक्ट्रिक बसगाडयांचा असणार आहे.

डिजिटल पेमेंटवर भर देणार

बेस्ट परिवहन विभागाची बससेवा अधिक सुकर व आकर्षक करण्यासाठी व डीजीटल पेमेंटच्या वाढत्या महत्वाचा लाभ घेण्यासाठी, बेस्ट उपक्रम आधुनिक सर्वसमावेशक सुलभ, एनसीएमसी अनुरुप डीजीटल तिकीट प्रणाली अंमलात आणणार आहे.

त्यामुळे कागदरहीत तिकीट व पासचा पर्याय प्रवाशांना ऑनलाईन पेमेंट गेटवे प्रदातांबरोबर एकीकरण करुन युपिआय डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग आणि इतर सर्व लोकप्रिय ऑनलाईन पेमेंट पध्दती वापरण्याची मुभा मिळणार आहे.

तसेच, बेस्टच्या मोबाईल ऍप प्रणालीद्वारे (Mobile App) बस आगमनाची अचुक वेळ व कमी गर्दीची माहिती घेऊन प्रवाशी आपल्या प्रवासाचे नियोजन सहज करु शकतील. शहरातील महिला प्रवाशांना सुरक्षित बस प्रवास करता यावा याकरीता एक विशेष (SOS ) बटण मोबाईल ऍप असेल व आणिबाणी प्रसंगी महिला प्रवाशांना मदत मागण्याकरीता त्याचा वापर करता येईल, असे बेस्ट प्रशासनाने म्हटले आहे.

तेजस्विनीच्या धर्तीवर महिलांसाठी विषेश बससेवा

बेस्ट परिवहन विभागातर्फे महिलांसाठी तेजस्विनी बससेवा देण्यात येते. त्याच धर्तीवर गर्दीच्या मार्गांवर व गर्दीच्या वेळी महीलांसाठी ‘विशेष बसगाडया’ प्रवर्तीत करण्याचे बेस्टने ठरवले आहे. त्याचप्रमाणे विविध कंपन्या, कॉल सेंटर व शाळांकरीता विशेष बससेवा प्रवर्तित करुन उत्पन्न वाढविण्याची बेस्ट उपक्रमाची योजना आहे. (Special bus for women only)

मुंबई विमानतळ ते नरिमन पॉईंट व बीकेसी या ठिकाणी समर्पित बससेवा वातानुकुलीत (Dedicated electric AC buses from Mumbai airport to Nariman point and BKC) इलेक्ट्रिक बससेवेद्वारे देण्याची बेस्ट उपक्रमाची योजना आहे. इलेक्ट्रिक बससेवा शहरात वेगाने पसरविण्याकरीता, बेस्ट उपक्रम आपल्या सर्व आगारांमध्ये व बसस्थानकांमध्ये शहरातील अंदाजे ५५ ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. (public charging station)

यापुढे उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांसाठी, सेवांकरीता व इतर वापराकरीता केवळ इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्याचा बेस्टचा मानस आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here