@maharashtracity
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारच्या आदेशाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. मुंबईतील या इयत्तेच्या सर्व पालिका, खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात तब्बल दीड वर्षांनी ‘घंटा’ वाजणार आहे.
मात्र, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी त्याठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करून ती जागा निर्जंतुक करणे, शिक्षकांनी त्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करणे, सर्वांनी तोंडाला मास्क लावणे, सामाजिक व सुरक्षित अंतर राखणे, हाताची वारंवार स्वच्छता करणे या कोरोना नियमांची म्हणजेच त्रिसूत्रीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असणार आहे.
मुंबईत शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यास पालिका आयुक्त इकबाल चहल (BMC Commissioner IS Chahal)
यांनी परवानगी दिली असून यासंदर्भातील महत्वाच्या सूचना, नियम यांचे पालन करण्याबाबतचे परिपत्रक पालिकेतर्फे तातडीने जारी करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रातील इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सुचना शिक्षणधिकार्यांनी दिल्या आहेत.
पालिकेच्या मुंबईतील मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या २५५३ शाळा विदयार्थ्यांनी गजबजणार आहेत.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २५० शाळांचे सॅनिटायझेशन रविवारपर्यंत होणार आहे.
कोरोना खबरदारी म्हणून गेटवर स्क्रिनिंग, विद्यार्थ्यांना मोफत मास्क वाटप आणि आवश्यक ती सर्व प्रकारची काळजी घेतली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शाळा (८ वी ते १० वी) २४३ असून व त्यातील विद्यार्थी संख्या -४४,५२८ आहे. प्राथमिक शाळा ८ वी चा वर्ग असणाऱ्या ५३८ असून त्यातील विद्यार्थीसंख्या २२,८३३ एवढी आहे.
पालिकेच्या एकूण शाळा – ७८१ असून त्यातील विद्यार्थी संख्या ही ६७,३६१ एवढी आहे. उर्वरित इतर खाजगी शाळा, शासनाच्या शाळा, इतर बोर्डाच्या शाळा संख्या (८ वी ते १२ वी) – १७७२ व त्यातील विद्यार्थी संख्या ४४,६१४१ म्हणजे मुंबई परिक्षेत्रातील ८ वी ते १२ वी चे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा- २५५३ असून एकूण विद्यार्थी संख्या ही ५१,३५०२ आहे.