@maharashtracity
मुंबई: मुरबाड येथे बोगस डॉक्टरांमुळे पाच जणांचा हकनाक बळी गेला. हे प्रकरण गुरुवारी विधानपरिषदेत गाजले. शिवसेनेचे विलास पोतनीस, डॉ. मनीषा कायंदे (Dr Manisha Kayande) तसेच राकॉपाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी हे प्रकरण लावून धरले.
लक्षवेधीतुन विचारलेल्या या सूचनेला वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांनी उत्तर देत आगामी महिनाभरात बोगस डॉक्टरांची शोधमोहिम हाती घेतली जाईल असे आश्वासन दिले. तसेच बोगस आढळून येणाऱ्या डॉक्टरांची यादी जाहीर केली जाणार आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांना नोंदणी सक्तीची करणार असल्याची घोषणा मंत्री अमित देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख पुढे म्हणाले कि, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये अनास्था असून ती दूर करण्यासाठी सरकार कटीबध्द आहे. शिवाय बोगस डॉक्टरांची शोध मोहिम येत्या महिनाभरात सुरु केली जाणार आहे. यासाठी भरारी पथकांना जादा अधिकार दिले जाणार आहेत. आधीच्या समितींचे अधिकार वाढवण्यात येतील. यातून ग्रामीण भागात ग्रामपंचायतींमध्ये डॉक्टरांच्या नोंदणीची सक्ती केली जाणार असून बोगस डॉक्टरांची यादी सगळीकडे प्रसिध्द केली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.