४६ गावातील १७ हजार ३७८ नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार!

@maharashtracity

By मिलिंद माने

महाड (रायगड): सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या महाड तालुक्यातील बहुतांशी गावांना मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पर्जन्यवृष्टीचा (heavy rain) फटका बसतो. त्यामुळे यावर्षी असून ४६ गावातील १७ हजार ३७८ नागरिकांना दरड प्रवण क्षेत्रामधून भूस्खलन (landslide) होण्याच्या शक्यतेने स्थलांतरित (migrate) करावे लागणार आहे.

महाड तालुक्यातील बहुतांशी गावे ही दुर्गम व डोंगराळ भागात तीव्र उताराच्या जागेवर आहेत. तर कांही गावे डोंगराला लागूनच पायथ्याशी असल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

महाड तालुक्यातील संभाव्य दरडग्रस्त गावातील नागरिकांना व प्रशासनाला देखील येत्या पावसाळ्यात नैसर्गिक आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. मात्र, शासनाकडे संभाव्य दरडग्रस्त भागात भूस्खलन होईल किंवा तो भागात पावसाच्या पाण्यामुळे खचेल अशी पूर्व चेतावणी किंवा संकेत देणारी यंत्रणा विकसित नाही.

महाड तालुक्यातील ४६ गावातील १७ हजार ३७८ नागरिकांना स्थलांतरित करावे लागणार आहे. त्या गावांची नावे व त्यांची लोकसंख्या पुढील प्रमाणे – लोअर तुडील नामावली कोंड ३००, शिंगरकोंड मोरेवाडी २०३, आंबिवली पातेरीवाडी ९३, कोंडीवते मूळ गावठाण २०१, मुठवली ३१५, सोनघर ५१०, जुई बुद्रुक ११८६,. चांडवे खुर्द ६२०, सव ४०५, रोहन २३५, वलंग ४२३, कोथेरी जंगमवाडी १०५, माझेरी ७८८, पारमाची वाडी २५५, कुंबळे २३०, कोसबी १९८, वामने ४९८, चिंबावे बौद्धवाडी ४२१, वराठी बौद्धवाडी २९६, चोचिंदे ११६४, . गोठे बुद्रुक ७०५, आदिस्ते ३७०, खैरे तर्फे तुडील ४१८, कुर्ला दंड वाडी ८५, रावतळी मानेचीधार १७१, मोहोत सुतारवाडी २६३,मांडले ३३२, पिंपळकोंड ६६६, मुमुर्शी आंब्याचा कोंड १५६, मुमुर्शी गावठाण २९४, मुमुर्शी बौद्धवाडी २७६, वीर गाव व वीर मराठवाडी ४४, टोल बुद्रुक १२६०, दासगाव भोईवाडा १४५०, तळोशी ४३०, बिरवाडी वेरखोले ४५०, करंजखोल ५४०, नडगाव काळभैरव नगर २८५, पुनाडेवाडी १९, पाचाडवाडी २४, सांदोशी हेटकर कोंड ३४, शेलटोळी २६५, अंबेशिवथर १७५, वाळण बुद्रुक २२०. येथील नागरिकांना निवारा शेडमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करावे लागणार आहे.

महाड (Mahad) तालुक्यात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने (Geological Survey of India) भूस्खलन होणाऱ्या गावांमधील पाच गावे पहिल्या वर्गात, ६ गावे दुसऱ्या वर्गात तर ३८ गावे तिसाऱ्या वर्गात समाविष्ट केली आहेत. एकंदरीत स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांची संख्या कमी असली तरी मागील वर्षापेक्षा यावर्षी अतिवृष्टी होण्याची शक्यता जास्त असल्याने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने सूचना केल्याप्रमाणे संभाव्य दरडग्रस्त गावांचे स्थलांतर करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here