@maharashtracity
महापुरात अडलेला कचरा, लाकडे तशीच अडकून पडून
महाड: महाड – भोर मार्गावर महाडजवळील भोराव गावालगत असलेल्या सावित्री नदीवरील (Savitri River) पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. महापुरात (Flood) वाहून आलेला कचरा आणि लाकडे पुलाच्या खालील बाजूला अडकून पडली असून भविष्यात या लाकडांमुळे पुलाला धोका निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महाड – भोर मार्गावर भोराव जवळ सावित्री नदीवर जुना पूल आहे. महाड – भोर – पुणे रस्त्याच्या निर्मितीसाठी सन १९५० साली हा पूल बांधण्यात आलेला आहे. महामार्गावर असलेल्या सावित्री पुलाच्या दुर्घटनेनंतर या पुलाचीदेखील तपासणी (inspection of bridge) झाली होती.
यावर्षी ऐन पावसाळ्यात आलेल्या महापुरात या पुलावरून देखील पुराचे पाणी गेले. पोलादपूर भागातून मोठ्या प्रमाणावर चिखल, कचरा आणि लाकडे मोठ्या प्रमाणावर वाहून आला. हा कचरा या पुलाच्या खालील बाजूला असलेल्या लोखंडी रेलींगला अडकून पडले आहेत. यामध्ये अडकलेली अनेक लाकडे स्थानिक ग्रामस्थांनी काढून जळणासाठी घेवून गेले. मात्र अद्याप देखील कचरा, लाकडे यामध्ये अडकून पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) या पुलाच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देत नसल्याने भविष्यात पुन्हा महापूर आल्यास अडकलेल्या लाकडांमुळे धोका निर्माण होऊ शकेल.
या पुलाच्या वरील बाजूस देखील उगवलेले गवत काढून टाकण्यात आलेली नाही. हि स्थिती आजदेखील तशीच आहे. यामुळे वाहनांना ये- जा करताना अडथळा निर्माण होत आहे. पुलाच्या खालील बाजूला अडकलेली लाकडे आणि वरील बाजूस उगवलेले गवत यामुळे पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे दादली आणि इतर पुलाकरिता कोट्यावधी रुपये खर्च होत असताना मुख्य मार्गावरील या पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जाते याबाबत प्रश्न चिन्ह उभा राहिला आहे.