वरंध घाटात बांधलेली सिमेंट कॉंक्रीटची भिंत धोकादायक स्थितीत

@maharaahtracity

महाड: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला (Konkan) जोडणाऱ्या महाबळेश्वर आणि वरंधा या दोन्ही घाटात पक्के नाले नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याचे पहावयास मिळत आहे. दोन दिवस पडलेल्या पावसात हि स्थिती निर्माण होताच प्रशासनाने धावाधाव करत नालेसफाई करत अडत असलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यास सुरवात केली आहे. वरंध घाटात भोर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) बांधण्यात आलेली पक्की भिंत यामुळे धोक्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा (Satara) आणि पुणे (Pune) या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महाबळेश्वर (Mahabaleshwar) आणि वरंधा भोर घाटाची सन २०२१ मधील अतिवृष्टीत पुरती वाट लागली होती. संपूर्ण घाटात दरडी कोसळून (landsliding) घाट मार्ग तब्बल सहा महिने बंद होता. घाटात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि भेगा पडल्याने महाबळेश्वर आणि वरंध घाट वाहतुकीस धोकादायक बनला होता. या भेगा रस्त्यावर आलेल्या दरडी, मातीचा भराव हटवून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करण्यात आली होती.

वरंध आणि महाबळेश्वर या दोन्ही घाटात भोर आणि महाबळेश्वर सार्वजनिक बांधकामाने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर देखभाल दुरुस्तीच्या कामांना सुरवात केली होती. हि कामे करताना नाले सफाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. ठिकठिकाणी डोंगरावरून कोसळणारे पाणी थेट रस्त्यावर येत आहे. गेले दोन दिवस या दोन्ही घाटात मुसळधार पाऊस पडत आहे.

महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत विविध ठिकाणी आलेल्या दरडी काढण्याचे काम जून महिन्यापर्यंत सुरु होते. तर अनेक ठिकाणी सरंक्षण कठडे उभे करण्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या घाटात कोसळणारे धबधबे अनेक ठिकाणी रस्त्यावर आल्याचे चित्र व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्यानंतर प्रशासन जागे झाले.

वरंध घाटात वरंधपासून भोरपर्यंत डोंगर भाग असल्याने मातीचा भाग कोसळून रस्त्यावर येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग सतत खोदकाम करत कामे करत असल्याने माती खाली येण्याचे प्रमाण वाढत चालत आहे. भोर आणि महाडच्या सीमेवर असलेल्या पवारवाडी आणि इतर गावांच्या जवळ नालेसफाई झाली नाही आणि धबधबे थेट रस्त्यावर आल्याने नव्याने बांधलेली भिंत खचल्याचे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

वरंध घाटाप्रमाणेच सातारा जिल्हा जोडल्या जाणाऱ्या महाबळेश्वर घाटाची देखील गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत मोठे नुकसान झाले आहे. जुलै २०२१ मधील अतिवृष्टीमुळे जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील घाट मार्ग नादुरुस्त झाला होता. या घाटात रस्त्यावर आलेल्या दरडी हटवण्यात आल्या असल्या तरी रस्त्याला लागून असलेल्या दरडी आणि माती हटवण्यात आली नाही. यामुळे महाबळेश्वर हद्दीतील भागात नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे.

संरक्षक भिंती, गॅबियन पद्धतींच्या भिंती, नाले सफाई, आदींची कामे आजही अर्धवट अवस्थेत आहेत. महाबळेश्वर भागात दरडींचे प्रमाण मोठे असून डोंगर उतारावर आलेले दगड, माती हटवण्यास महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाला एक वर्ष लागले असल्याने नाल्यात पडलेली माती तशीच राहिल्याने नाले तुंबून हे पाणी रस्त्यावर येवू लागले आहे. सध्या दोन्ही घाटात आप्तकालीन यंत्रणा सज्ज ठेवली असल्याने साचून राहिलेल्या पाण्याला वाट काढून देण्याचे काम केले जात आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था दोन्ही घाटात व्यवस्थित नसल्याने हे पाणी साचून राहत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here