८० जणांची सुटका ; १० जण जखमी
Twitter: @maharashtracity
मुंबई: मुलुंड (पश्चिम) लालवाणी रोड येथे विठ्ठल नगरमधील सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. या आगीत वरच्या मजल्यापर्यंत गेलेली इलेक्ट्रिक केबल जळाली. त्यामुळे सोसायटीमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
या आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे इमारतीत अडकलेल्या ८० रहिवाशांची अग्निशमन दलाने सुखरूप सुटका केली असल्याची माहिती अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले. मात्र, त्यापैकी १० जणांच्या नाकातोंडात धूर गेल्याने त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला, ज्यामुळे त्यांना नजीकच्या पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती दलाकडून देण्यात आली.
सुदैवाने अग्निशमन दलाने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अवघ्या १४ मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मुलुंड (पश्चिम), सेवालाल लालवाणी रोड, विठ्ठल नगरमधील तळमजला अधिक सात मजली जागृती सोसायटीमध्ये बुधवारी दुपारी २.५५ वाजेच्या सुमारास तळमजल्यावर असलेल्या कॉमन वीज मिटर बॉक्समध्ये अचानकपणे आग लागली. इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक केबल, वीज मिटर, स्वीचेस आदींना आग लागली होती. इलेक्ट्रिक वायर, केबल लाईनला आग लागल्याने व ते जळाल्याने आगीचा काळाकुट्ट धूर संपूर्ण इमारतीमध्ये पसरला होता.
या आगीची माहिती मिळताच इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. आगीप्रसंगी इमारतीमधील फ्लॅट, लॉबी, टेरेस, जिन्यावर लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आदी जवळजवळ ८० रहिवाशी इमारतीत अडकून पडले होते. मात्र, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू करून ८० जणांची सुखरूप सुटका केली. त्यापैकी १० जणांच्या ताेंडात आगीचा धूर नाकातोंडात गेल्याने धुराची बाधा झाली.
या १० जणांमध्ये, ३२ ते ६३ वयोगटातील ७ महिला, ४ ते १० वयोगटातील २ मुली व १ मुलगा अशा ३ मुलांचा समावेश असून त्यांना तात्काळ नजीकच्या पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून अवघ्या १४ मिनिटात म्हणजे दुपारी ३.०९ वाजता या आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीच्या कारणाचे स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी अधिक तपास करीत आहेत.
धुराची बाधा झालेल्या रहिवाशांची नावे –:
(१) सुशीला अढाव (६३)
(२) राजेश्री सकपाळ (५८)
(३) अश्विनी सकपाळ (५२)
(४) सुवर्णा शिंदे (५०)
(५) राजेश्री अढाव (३६)
(६) मंजुळा जेठवा (४०)
(७) अक्षरा सावरकर (३२)
(८) विशाखा अढाव (१०)
(९) स्वरा अढाव (८)
(१०) कवीश सारवरकर (४)