@maharashtracity
मुंबई कोल्हापूर (Kolhapur) येथे अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे (flood) खंडित झालेल्या पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी मुंबई महापालिकेचे (BMC) एक विशेष पथक कोल्हापूरसाठी रवाना झाले आहे.
संदर्भातील माहिती, महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर येथील पूरबाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेचे एक पथक शनिवारी कोल्हापूरकडे रवाना झाले आहे. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी.वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
कनिष्ठ अभियंता आकाश रैनक यांच्यासमवेत रवाना झालेल्या विशेष पथकात संबंधित कर्मचाऱ्यांसह ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री पाठविण्यात आली आहे.
२०१९ मध्येसुद्धा मुंबई महापालिकेकडून मदत
कोल्हापुरामध्ये २०१९ मध्ये सुद्धा अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महापालिकेच्या विविध विभागातर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुरळीत करण्यासाठी पालिका कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती.