धुळे: धुळे तालुक्यातील शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकर्यांनी नवनवीन तंत्रज्ञाचा वापर करावा, असे आवाहन आ.कुणाल पाटील यांनी केले.
आ.पाटील यांच्या हस्ते कृषी संजीवनी सप्ताहाचा सोमवारी धुळे तालुक्यातील हडसूणे येथे शुभारंभ झाला. त्यावेळी आ.पाटील बोलत होते.
धुळे तालुका कृषी विभागामार्फत तालुक्यात दि.21 जुन ते 1 जुलै दरम्यान शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विविध योजनांची माहिती व्हावी म्हणून तसेच प्रत्यक्ष शेतात व गावागावात जावून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. या सप्ताहाचे उद्घाटन महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कृषी संजीवनी सप्ताह शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम असून कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितपणे वाढ होते. शेतकर्यांचे उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून शेतीत नवनवीन तत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. शेती आणि शेतकरी खऱ्या अर्थाने या देशातील अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याकरीता शेतकरी समृध्द झाला पाहिजे, असे मत आ.कुणाल पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान, शेतीक्षेत्रात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी ट्रॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र या आधुनिक तंत्राचा वापर केला जात आहे. त्यामुळे आ. कुणाल पाटील यांनी शेतीत बीबीएफ पेरणी यंत्र चालवून शेतकर्यांना प्रात्याक्षिक करुन दाखविले.
तसेच या कार्यक्रमात कृषी संचालक शांताराम मालपुरे यांनी प्रास्ताविकात कृषी संजीवनी सप्ताहाची माहिती दिली व शेतकऱ्यांना विविध योजना समजावून सांगितल्या.
या कार्यक्रमाला आ. कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, तालुका कृषी अधिकारी जी.के.चौधरी, प्रगतीशील शेतकरी माजी सरपंच अरुण पाटील, चुडामण मराठे, प्रगतीशील शेतकरी शांताराम पाटील, संजय पाटील, कैलास केले, चेतन जिरे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रभावती पाटील यांनी केले.