@maharashtracity

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तालावांपैकी एक मात्र लहान असलेला विहार तलाव (Vihar Lake) १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजल्यापासून भरून वाहू लागला आहे. तत्पूर्वी, तुळशी तलाव (Tulsi lake) हा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता, पवई तलाव १२ जून रोजी दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला होता. आता विहार तलावही भरून वाहू लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही बाब सुखावह ठरली आहे.

गेल्यावर्षी ५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास विहार तलाव पूर्ण भरुन वाहू लागला होता. २०१९ मध्ये ३१ जुलै रोजी तर २०१८ मध्‍ये १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. विहार तलावाची पाणी साठवण क्षमता २७,६९८ दशलक्ष लीटर इतकी आहे.

मुंबईला मुंबईबाहेरील प्रमुख पाच तलाव आणि मुंबईतील तुळशी व विहार या दोन तलावांमधून अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पुरवठा केला जातो. विहार तलावातून मुंबईला दररोज सरासरी ९० दशलक्ष लीटर (९ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या (BMC) जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

विहार तलावाबाबत महत्त्वाची माहिती

विहार तलाव मुंबई महापालिका मुख्यालयापासून अंदाजे २८.९६ किलोमीटर अंतरावर आहे.

या तलावाचे बांधकाम सन १८५९ मध्ये पूर्ण झाले.
या तलावाच्या बांधकामासाठी त्यावेळी ६५.५ लाख रुपये एवढा खर्च आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे १८.९६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे ७.२६ चौरस किलोमीटर एवढे असते.
तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा २७,६९८ दशलक्ष लीटर एवढा असतो.
हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here