राजीव सातव यांच्या श्रद्धांजली सभेत भावुक झाले सर्वपक्षीय युवा नेते

0
532

मुंबई: काँग्रेसचे दिवंगत नेते खा. राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सध्या कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेत देशातील सर्वपक्षीय खासदार आणि नेत्यांनी राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली.

सातव यांच्या आठवणींना उजाळा देताना महिल्या व बालकल्यामंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या की, नेहमी प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आमचा भाऊ आमच्यातून निघून गेला. मत्ससंवर्धमंत्री अस्लम शेख म्हणाले, सातव यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान, एक मोठे नेतृत्व हरपले. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले, कमी वयात शिखर गाठल्यानंतर देखील राजीव सातव विनम्र राहिले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाविकास आघाडी कायम राहावी म्हणून सर्वात जास्त सजग असणारा नेता म्हणजे राजीव सातव. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोविडनंतर मी राजीव सातव यांना भेटणार होतो, परंतु ती भेट आता कधीच होणार नाही. गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजीव सातव यांचे विचार, त्यांची स्मृती जिवंत ठेवणे गरजेचे आहे. राज्यमंत्री विश्वजित कदम म्हणाले की,रस्त्यावर उतरून आंदोलने कशी करायची हे खऱ्या अर्थाने मला राजीव सातव यांच्याकडून शिकायला मिळाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजीव सातव यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्या पक्षात नसलो तरी राजीव सातव हे नेहमीच माझी विचारपूस करत असत. ते सुसंकृत व्यक्तीमत्व होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राजीव सातव हे अतिशय अभ्यासू आणि तितकेच नम्र वृत्तीचे नेते होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राजीव सातव हे एक उत्तम, अभ्यासू संसदपटू होते, त्यांचा अभ्यास, वक्तृत्व आणि अविर्भाव आम्हाला संसदेत बरेच काही शिकवून गेले. तर बी. व्ही. श्रीनिवास म्हणाले की, कोणत्याही आपत्तीत कसे काम करायचे हे खरं तर मला राजीव सातव यांच्याकडून शिकायला मिळाले.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले की, कोणतीही समस्या असो  राजीव सातव हे नेहमीच माझ्या बाजूने उभे राहिले. अगदी कमी वयातच त्यांनी जिल्हा पातळीपासून आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. त्यानंतर युवक काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करत मोठी मजल मारली होती. परंतु आज असे उमेदीच्या वयात त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी ही न भरून निघणारी आहे, अशी हळहळ  काँगेसच्या प्रमुख नेत्यांकडून आणि सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, राजीवभाऊंनी संसदेत देशासाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोरदार आवाज उठवला. आमदार कुणाल पाटील म्हणाले, प्रत्येक प्रसंगाला धीरगंभीरपणे तोंड देणारा मित्र आम्ही गमावला आहे. तसेच एक विनम्र नेता आपल्यातून निघून गेला असे शमा मोहम्मद म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here