#संजय राऊत यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा इशारा

By अनंत नलावडे

Twitter: @NalavadeAnant

मुंबई: खा. संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि आव्हान देणे बंद केले पाहिजे, अन्यथा संयम सुटेल आणि भाजप रस्त्यावर उतरेल, असा खणखणीत इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawabkule)  यांनी बुधवारी मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिला.

बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आव्हान देऊ नये. राज्याचे राजकीय वातावरण खराब करू नये आणि सामाजिक वातावरण बिघडवू नये. अन्यथा लोकांचा संयम सुटेल. यातून उद्या उद्रेक झाला तर थांबविता येणार नाही. कोणत्याही नेत्याचा व्यक्तिगत अपमान होईल, असे संजय राऊत यांनी बोलू नये. मर्दानगी काढणे, नालायक म्हणणे हे महाराष्ट्र सहन करणार नाही. राऊत यांनी चिथावणी देणे बंद करावे. नाही तर त्यांच्या बोलण्याचा उलटा परिणाम होईल, असाही इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र–कर्नाटक सीमा प्रश्न Mahaeashtra – Karnataka border dispute) सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यावर न्यायालयातच तोडगा निघेल. न्यायालयाने लवकरात लवकर सुनावणी करून या प्रकरणी निर्णय द्यावा, यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत, असे आपले आवाहन असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

ते म्हणाले की, या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयातच (Supreme Court) तोडगा निघेल हे माहिती असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी आपण स्वतः सीमा भागात जाणार असल्याचे जाहीर करणे शोभत नाही. त्यांना सीमाभागात जायचे होते तर ते आधी का गेले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो, अशी विचारणा बावनकुळे यांनी यावेळी केली.

जी २० संबंधी बैठकीस निमंत्रण असूनही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गैरहजर राहिले. त्यांनी महाराष्ट्राच्या हितापेक्षा अधिक महत्त्व स्वतःच्या राजकारणाला दिले व महाराष्ट्राचा अपमान केला, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here