@maharashtracity
मुंबई: मुंबईत माटुंगा व इतर विभागात नागरिकांना भेडसावणारी पाणी समस्या येत्या तीन दिवसांत न सोडविल्यास मुंबई काँग्रेसतर्फे (Mumbai Congress) माटुंगा व अन्य विभागातील पालिका कार्यालयांवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी दिला आहे.
मुंबईत व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस पडला. त्यामुळे तलावांत मुबलक पाणीसाठा होता. मात्र असे असताना काही दिवसांपूर्वी भातसा तलावाच्या ठिकाणी जल विद्युत केंद्रात मोठा तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने मुंबईत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली होती. तेव्हापासून मुंबईत पाणी टंचाई जाणवत आहे. ही पाणी कपात रद्द झाली असली तरी पाण्याची समस्या भेडसावत आहे.
सध्या मुंबईत कडक उन्हाळा जाणवत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नसल्याने काँग्रेस पक्षातर्फे पालिकेच्या एफ/ उत्तर कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिला आहे.