@maharashtracity
बदलत्या जीवनशैलीमुळे पालिकेचा महत्वाचा निर्णय
मुंबई: आऊटसोर्सिंग करुन मुंबई महापालिकेने (BMC) पहिल्या टप्प्यात १५ दवाखाने संध्याकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत सुरु केले. या १५ दवाखान्यासोबत (clinics) आता आणखी १३ दवाखाने पालिका सुरु करणार आहे. त्यामुळे पालिकेचे आता सायंकाळचे एकूण २८ दवाखाने सुरु राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
मुंबईत महानगरपालिकेचे सकाळी ९ ते संध्याकाळी ४ या वेळेत १८६ दवाखाने सुरु आहेत. मात्र सध्या बदललेत्या जीवनशैलीमुळे (life style) सकाळच्या वेळी कामगार वर्ग रोजगारात व्यस्त असल्याने ते दवाखान्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे महानगर पालिकेने यापूर्वी संध्याकाळच्या वेळीही दवाखाने सुरु करण्याचा निर्णय घेतला.
सायंकाळी पालिका दवाखाने सुरु ठेवण्याच्या निर्णयाचा हा दुसरा टप्पा असून यापूर्वी महानगर पालिकेने १५ दवाखाने संध्याकाळच्या वेळीही सुरु ठेवण्यास सुरवात केली. आता दुसऱ्या टप्प्यात १३ दवाखाने सुरु ठेवण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
हे तेरा दवाखाने तेरा वॉर्डात असून यात एस.व्ही.पी रोड दवाखाना (बी वॉर्ड), आर.आर.मार्ग दवाखाना (डी वॉर्ड), नायगाव प्रसुतीगृह दवाखाना (एफ दक्षिण वॉर्ड), शिवडी दवाखाना(एफ दक्षिण वॉर्ड), नटरवलाल दवाखाना (के पुर्व वॉर्ड), शास्त्रीनगर दवाखाना (आर उत्तर वॉर्ड ), गोराई दवाखाना (आर उत्तर वॉर्ड), बैलबाजार दवाखाना (एल वॉर्ड), चांदिवली दवाखाना (एल वॉर्ड), मोहिली व्हिलेज दवाखाना (एल वॉर्ड), पंतनगर दवाखाना (एन वॉर्ड), नाथ पै दवाखाना (एन वॉर्ड), साईनाथ दवाखाना (एन वॉर्ड) हे दवाखाने आहेत.
या दवाखान्यांमध्ये मलेरीया (malaria) , डेंग्यू (Dengue), मधुमेह (Diabetic), रक्त चाचणीही (blood test) केली जात असून औषध उपचारही पुरवले जातात. त्याचबरोबर लसीकरण, ताप, सर्दी खोकला या आजाराचीही औषधे दिली जात असल्याचे सांगण्यात आले.