@maharashtracity

कोरोना नियमांचे पालन करून दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन

६,१०२ गणेशमूर्तींमध्ये ५५ सार्वजनिक तर ६,०४७ घरगुती मूर्ती

कृत्रिम तलावांत सर्वाधिक ३,५८९ मूर्तींचे विसर्जन, ३,५४८ घरगुती मूर्ती

मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या (corona) सावटाखाली समस्त मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करीत शुक्रवारी आपल्या श्री गणेशांचे जोरदार स्वागत करीत त्यांना आपल्या घरात, सार्वजनिक मंडळात, कार्यालयात विराजमान केले.

मात्र, गेल्यावर्षीपासून मुंबईत ठाण मांडून बसलेल्या’कोरोनासारख्या महामारीचे संकट लवकरात लवकर व कायमचे दूर होऊ देत’, असे साकडे घालत सर्व राजकीय पक्षांनी, पक्षाच्या नेत्यांनी आणि समस्त मुंबईकरांनी शनिवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत दीड दिवसांच्या ६ हजार १०२ मूर्तींचे आणि १४ हरतालिकांचे विसर्जन केले.

या ६ हजार १०२ गणेश मूर्तींमध्ये, ६ हजार ४७ घरगुती गणेशमूर्तींचा तर ५५ सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच, नैसर्गिक विसर्जन स्थळांपेक्षाही कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला चांगला प्रतिसाद लाभला आहे. एकूण ६ हजार १०२ गणेशमुर्तींमध्ये, कृत्रिम तलावांतील ३ हजार ५८९ गणेश मूर्तींचा समावेश आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) गतवर्षीप्रमाणेच यंदाही ६८ नैसर्गिक विसर्जन स्थळी व १७० पेक्षाही जास्त कृत्रिम तलाव (Artificial ponds) व फिरत्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली आहे. सार्वजनिक व कृत्रिम विसर्जन स्थळी पालिका व खासगी कर्मचारी यांची गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. तसेच, समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी जीवरक्षक, पोलीस यांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.

कोरोनाचे सावट असल्याने अनेक गणेश मंडळांनी व गणेश भक्तांनी साधेपणाने दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला. विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असल्याने गणेश भक्तांनी घरात, कार्यालयात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणीच गणेशाची भावपूर्ण आरती केली व ‘ गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला.

शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत गणेश भक्तांनी दीड दिवस आपल्या लाडक्या गणपती बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्थळी ५५१ गणेशमूर्तींचे तर १२ हरतालिका यांचे विसर्जन केले.

वास्तविक, शनिवारी दुपारी १२ वाजेपर्यंत जुहू, दादर या महत्वाच्या चौपट्यासह नैसर्गिक विसर्जनस्थळी दीड दिवसांच्या ४६ घरगुती गणेशमूर्तींचे तर कृत्रिम तलावांसारख्या विसर्जन स्थळी दीड दिवसांच्या ३५ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले. याशिवाय, कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ३ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले होते.

त्यानंतर, दुपारी १२ वाजताच्या तुलनेत
दुपारी ३ वाजताच्या सुमारास गणेशभक्तांचा विसर्जन स्थळी ओघ वाढला होता. त्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत समुद्र चौपट्या, मोठे नैसर्गिक तलाव, खाडी आदी विसर्जन स्थळी ५ सार्वजनिक गणेशमूर्तींचे, ५४६ घरगुती गणेश मूर्तींचे म्हणजेच दीड दिवसांच्या एकूण ५५१ गणेशमूर्तींचे व १२ हरतालिका यांचे विसर्जन करण्यात आले आहे.

तसेच, सायंकाळी ६ वाजेपर्यंत, नैसर्गिक व कृत्रिम तलावांत मिळून एकूण ६ हजार १०२ गणेश मूर्तींचे व १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे. या ६,१०२ गणेशमूर्तींमध्ये ५५ सार्वजनिक तर ६,०४७ घरगुती मूर्तींचा समावेश आहे.

कृत्रिम तलावांना अधिक चांगला प्रतिसाद

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, अनेक गणेशभक्तांनी नैसर्गिक विसर्जनस्थळ जवळ असल्याने त्या ठिकाणी तर अनेकांनी नैसर्गिक विसर्जन स्थळ थोडे दूर अंतरावर असल्याने व कृत्रिम तलावांची सुविधा जवळच असल्याने त्या ठिकाणी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले.

दुपारी १२ वाजेपर्यंत कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ३५ घरगुती मूर्तींचे व ३ हरतालिका यांचे विसर्जन केले होते. मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास दीड दिवसाच्या २ सार्वजनिक गणेशमूर्तींचे तर २९७ घरगुती गणेशमूर्तींचे आणि ९ हरतालिका यांचे विसर्जन करण्यात आले.

तसेच, सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावांत एकूण ३ हजार ५८९ गणेश मूर्तींचे तर ११ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे. या ३ हजार ५८९ गणेशमूर्तींमध्ये सार्वजनिक ४१ मूर्तींचा आणि ३ हजार ५४८ घरगुती मूर्तींचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here