@maharashtracity
कोरोनाचे दरमहा सरासरी ५३ हजार रुग्ण , ६०३ बळी
कोरोनाचे दररोज सरासरी २० बळी
मुंबई: गेल्या १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट २०२१ या ८ महिन्यांच्या कालावधीत विविध रुग्णालयात दाखल कोरोनाच्या ४ लाख २५ हजार १३९ रुग्णांची नोंद झाली असून ४ हजार ८२७ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू (patient died due to corona) दर १.१३ एवढा नोंदवला गेला आहे.
जर या आकडेवारीवरून सरासरी काढल्यास दर महिन्याला कोरोनाचे सरासरी ५३ हजार १४२ रुग्ण आढळून आले आहेत
तर दररोज सरासरी १ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे, कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांची संख्या पाहता दर महिन्याला कोरोनाचे सरासरी ६०३ बळी गेले आहेत तर दररोज सरासरी २० बळी गेले आहेत.
दिनांक १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या ८ महिन्यांच्या कालावधीत कोरोनाचे सर्वाधिक जास्त २ लाख १४ हजार ९८५ रुग्ण हे एप्रिल महिन्यात तर सर्वात कमी म्हणजे ७ हजार ९६४ रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात आढळून आले आहेत.
त्याचप्रमाणे, गेल्या ८ महिन्यात कोरोनाचे सर्वात जास्त १ हजार ९३४ बळी हे एप्रिल महिन्यात गेले असून सर्वात कमी १०५ बळी हे ऑगस्ट महिन्यात गेले आहेत.
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. तेव्हापासून ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत कोरोनाचे ७ लाख ४४ हजार १५५ रुग्ण आढळून आले असून १५ हजार ९७७ रुग्णांचा बळी गेला आहे. या एकूण रुग्णांपैकी ३ हजार १०६ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत कोरोनाचे १५ हजार ९७७ बळी गेले आहेत.