@maharashtracity
१५ ऑगस्टपासून होणार अंमलबजावणी
मुंबई: प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून होणाऱ्या लोकल प्रवासाच्या विनंतीला मान देऊन ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील त्यांना दिनांक १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही लसीचा डोस घेतलेल्या रेल्वे प्रवाशांची चिंता मिटल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दरम्यान, अद्याप कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेतून पूर्णपणे सावरलो नसून संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचा इशारा केंद्र सरकार वारंवार देत असल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. मात्र, अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास (local train) करण्यास मान्यता देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्मार्टफोन असलेले प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. तर ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील. लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड (QR code) असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येणार आहे.
अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नये. तसेच लसींचे दोन डोसेस घेऊनच रेल्वे प्रवास करावा, असेही आवाहन या वेळी करण्यात आला.