@maharashtracity

वरळी गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटना ; ‘

मुंबई: वरळी बीडीडी चाळ गॅस सिलेंडर दुर्घटनेतील 4 महिन्याच्या त्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या जखमी आईचाही आज मृत्यू झाला.

वरळीत गेल्या मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) होऊन एकाच कुटुंबातील चारजण जखमी झाले होते. त्यातील चार महिन्याच्या उमेश पुरी याचा घटनेच्या २४ तासातच दुर्दैवी मृत्यू झाला होता तर शनिवारी ‘त्या’ मुलाचे गंभीर जखमी अवस्थेतील वडील आनंद पुरी यांचा मृत्यू झाला.

‘त्या’ मुलाची आई विद्या पुरी (२५) यांची प्रकृती स्थिर असल्याचे कालपर्यंत सांगितले जात असताना सोमवारी सायंकाळी त्यांचाही कस्तुरबा रूग्णालयात (Kasturba hospital) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३ वर गेली आहे.

त्यामुळे पुरी कुटुंबीय राहत असलेल्या वरळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर पुरी कुटुंबीयांवर गंभीर जखमी अवस्थेत उपचार करण्यात अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या त्या डॉक्टर, नर्स यांना केवळ निलंबित न करता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

आता या दुर्दैवी पुरी कुटुंबीयातील विष्णू पुरी (५) हा एकटा मुलगा सध्या कस्तुरबा रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

या घटनेवरूनच पालिका स्थायी समिती व पालिका सभेतही तीव्र पडसाद उमटले होते. शुक्रवारी शिवसेना व भाजप नगरसेवकांत राडा होऊन प्रकरण पोलिसात गेले आहे.

मात्र या दुर्दुवी घटनेला कारणीभूत नायर रुग्णालयातील डॉक्टर, नर्स यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाबाबतचा उप अधिष्ठाता यांच्या मार्फत करण्यात येत असलेल्या सखोल चौकशीचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.

हा अहवाल पालिका स्थायी समिती अथवा पालिका सभेत सादर झाल्यावर याप्रकरणी आणखीन तीव्र पडसाद उमटले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here