@maharashtracity
रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी,
पहाटे ५ पर्यंत संचारबंदी
मुंबई: मुंबईत कोरोना (corona) नियंत्रणात आलेला असला तरी मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने सामान्यांना रेल्वे प्रवासावर बंदी कायम ठेवली आहे. मात्र निर्बंधात आजपासून काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. दुकाने रात्री १० पर्यन्त तर हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री दुपारी ४ पर्यन्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता सुधारित आदेश काढून मॉल उघडे ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच, गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन, रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी तर पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (BMC Commissioner I S Chahal) यांनी याबाबत आज परिपत्रक जारी केले आहे.
मुंबईत पालिकेच्या विविध उपाययोजनांमुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. त्यामुळे निर्बंधांतून शिथिलता आणण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला. त्याप्रमाणे सोमवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यात मुंबईतील सर्व दुकाने रात्री १० वाजेपर्यंत तर औषधांची दुकाने आठवडाभर २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. चित्रीकरणालाही परवानगी देण्यात आली आहे.
मात्र गर्दीचे मोठे ठिकाण असलेल्या मॉल उघडे ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, शहर व उपनगरात रात्री ११ वाजेपर्यंत जमावबंदी तर रात्री ११ वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.