@maharashtracity
अंधेरीत सर्वात जास्त १,२३० मृत्यू
मुंबई: मुंबईत (Mumbai) गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे (corona) १५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, सर्वात जास्त मृत्यू ‘के/ पूर्व’ विभागात अंधेरी / पूर्व भागात १ हजार २३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सर्वात कमी मृत्यू ‘ए’ विभाग कुलाबा, फोर्ट भागात १७५ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ५० वर्षांवरील १३ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सुदैवाने मुंबई महापालिकेने (BMC) आतापर्यन्त केलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या दीड वर्षात आढळून आलेल्या ७ लाख ३६ हजार २२ रुग्णांपैकी ७ लाख १३ हजार १६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे आता ४ हजार ५५० सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
वास्तविक, मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव सुरू झाला. कोरोनावरील औषध उपलब्ध नसल्याने सुरुवातीच्या काळात रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. मात्र तरीही पालिकेने कोरोनासंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने, दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने आणि उपाययोजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविल्याने कोरोनाच्या पहिल्या लाटेला परतवून लावण्यात पालिकेला यश आले. नंतर दुसरी लाटही थोपविण्यात पालिकेला यश आले. आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची पालिकेची जोडदार तयारी सुरू आहे.
सर्वाधिक मृत्यू – विभाग निहाय
मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत १५ हजार ९२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये के/ पूर्व विभागात अंधेरी (पूर्व) येथे सर्वाधिक १,२३० मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यानंतर एस विभाग भांडुप मध्ये १,०२७, आर / सेंट्रल बोरिवली विभागात ९८५, पी /नॉर्थ मालाड विभागात ९६२, आर/ साऊथ कांदिवली विभागात ९३३, के/ वेस्ट अंधेरी ८५२ , एन विभाग घाटकोपर मध्ये ८१८ मृत्यूंची नोंद झाली आहे.