Twitter :@vivekbhavsar

मुंबई

खारघर येथे झालेल्या दुर्घटनेसंदर्भात नेमलेल्या चौकशी समितीवर कोणाचा दबाव होता? ही समिती कुठल्या उच्चपदस्थ पदाधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात थेट इशारा दिला. तुम्हीही मुख्यमंत्री होता, तुमच्या काळात देखील काय – काय घडले हे आम्ही बाहेर काढू, असा थेट इशारा मुनगंटीवार यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी खारघर येथे भर दुपारी आयोजित केलेल्या मेळाव्यात धर्माधिकारी यांच्या अनुयायांचा मृत्यू झाला होता. चेंगरा चेंगरी होऊन काही भाविकांचा मृत्यू झाला तर पाणी न मिळाल्यामुळे अनेक भाविकांची तब्येत बिघडली होती. हा मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे  मांडण्याचा पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केला. अन्य विषयावर चर्चा बाजूला ठेवून यावर चर्चा व्हावी, अशी त्यांची मागणी होती.

यावर बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, शासनाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात १६ एप्रिल २०२३ रोजी दुर्घटना घडली. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी २० एप्रिल २०२३ रोजी एक सदस्यीय समिती नेमून तिला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत या समितीला तीन वेळा मुदतवाढ देऊन सुद्धा समितीचा अहवाल आलेला नाही. या समितीला खरेच काम करण्याची इच्छा आहे का? समिती कोणत्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, शासन किती गंभीर आहे? कोणत्या राजकीय व्यक्तीला संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, कार्यक्रमाची दुपारची वेळ कोणत्या राजकीय पदाधिकाऱ्याच्या दबावाखाली येऊन अधिकाऱ्यांनी ठरवली? अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणाचेही नाव न घेता केला. तरीही त्यांचा रोख थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे होता.

दोषी कोण आहे यावर समितीच्या कार्यकक्षेत नोंद नाही, याचा अर्थ सरकार कोणालातरी संरक्षण देत आहे असा आरोप चव्हाण यांनी केला.

यावर संतप्त झालेले सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना थेट इशारा दिला की तुम्ही देखील मुख्यमंत्री होता आणि तुमच्या काळात घडलेल्या घटना देखील आम्ही बाहेर काढू. खारघरच्या मुद्द्यावर तरांकित प्रश्न आणि  लक्षवेधी चर्चेला येणार आहे. तुम्ही मुख्यमंत्री असताना झालेल्या घटनांचीही आपण माहिती देऊ. तुमच्या काळातही किती समित्यांना मुदतवाढ देण्यात आली हे देखील त्यावेळेस स्पष्ट करू, असा इशारा मुनगंटीवार यांनी त्यांच्या उत्तरात दिले.

तुम्हाला अपेक्षित उत्तर दिले जाणार नाही, सत्यावर आणि तथ्यावर आधारित उत्तर दिले जाईल, असे मुनगंटीवार यांनी सभागृहाला सांगितले.

त्यांनी (पृथ्वीराज चव्हाण) मुदतवाढीचे राजकारण केले, उच्च पदस्थ अधिकारी वगैरे राजकारण करायचे आणि उत्तर ऐकायचे नाही, असे सांगून मुनगंटीवार यांनी सहनशीलता वाढवा असा सल्ला विरोधी बाकावरील सदस्यांना दिला. तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्या कारणांनी समितीला मुदतवाढ दिली, त्याच कारणामुळे या समितीला (खारघर घटना) मुदतवाढ दिली, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले

काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दले की, मुनगंटीवार यांची भाषा योग्य नाही, ते पृथ्वीराज चव्हाण यांना दम देत आहात का? अध्यक्षांनी संबंधित मंत्र्यांना समज द्यावी. 

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शब्द तपासून पाहू अशी ग्वाही देऊन संभाव्य वादावर पडदा टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here