@maharashtracity
वर्सोवा येथील समुद्रात ५ मुले बुडाली ;
२ मृत, २ बचावले; एकजण बेपत्ता
मुंबई: मुंबईत संपूर्ण गणेशोत्सवात गौरी, गणेश विसर्जनात कुठेही विघ्न आले नाही. मात्र, अनंत चतुर्दशीदिनी रात्री ९ वाजेच्या सुमारास वर्सोवा जेट्टी येथे गणेशविसर्जन (Ganesh Visarjan) करताना पाच तरुण मुले दुर्दैवाने समुद्रात बुडाली.

त्यांचा पोलीस (Police), अग्निशमन दल (Fire Brigade) व स्थानिक कोळी बांधव यांनी बोटीद्वारे कसून शोध घेतला असता दोघेजण सुखरूप सापडले असून त्यांच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दोघांचे मृतदेह सोमवारी हाती लागले असून आणखीन एकजण अद्यापही बेपत्ता आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत पावलेल्या दोघांची नावे शुभम रंजनलाल निर्मळ (१८) व संजय हिरामन तावडे (२०) अशी आहेत. तर बचावलेल्या मुलांची नावे शिवम रंजनलाल निर्मळ (१९) आणि विजय रोहिदास मराठे (१८) असे असल्याचे समजते.

शिवम याच्यावर एचबीटी रुग्णालयात (HBT Hospital) तर विजय याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात (Kokilaben Hospital) उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत बेपत्ता मुलाचे नाव अद्याप समजलेले नाही. मात्र पोलीस, स्थानिक लोक व अग्निशमन दलाकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.