X: Rav2Sachin

मुंबई : अलीकडेच अग्निशमन दलाचे अधिकारी फ्रान्समध्ये गेले होते. येथून अत्याधुनिक सुविधा संपन्न असे अग्निसुरक्षेची सुसज्ज अशी ७ वाहने मुंबई अग्निशमन दलात दाखल होणार आहे. एका वाहनांची किंमत सुमारे ११ कोटी रुपये सांगितली जात आहे. पण कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन परदेशातून वाहन मुंबई आणताना ते वाहन योग्य पद्धतीचे आहे की नाही, हे पडताळून पाहण्याची पूर्ण जबाबदारी अग्निशमन दलातील उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) यांच्यावर होती. हे पद अभियंताचे हक्काचे असले तरी २०२१ पासून उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) या पदावर अभियंतांची नियुक्ती न करता यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिकलचे कोणतेही ज्ञान नसलेल्या उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना वाहन खरेदी करण्यासाठी परदेशात पाठवले जात आहे. सोबत अग्निशमन दलाच्या प्रत्येक वाहनांची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करुन खरेदी केलेली वाहने अकार्यक्षम निघाली तर त्याला जबाबदार कोण? ही वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. मुंबईची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार पाहता येथील अग्निसुरक्षेची मोठी जबाबदारी मुंबई अग्निशमन दलावर आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता अग्निशमन दलाची अग्निशमन केंद्रे वाढवणे सोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानी सुविधा संपन्न असे सुज्ज असे अग्नी सुरक्षेच्या वाहनांची संख्या वाढवणे हे अग्निशमन दलाचे लक्ष्य आहे. मुंबई अग्निशमन दल तशी वेळोवेळी पावले उचलत आहे.

मुंबई अग्निशमन दलात आज सुमारे 350 अग्निसुरक्षेची वाहने आहेत. प्रत्येक अग्निशमन केंद्रात वाहने दुरुस्त करण्यासाठी गॅरेज आहेत. तसेच भायखळा आणि मरोळ येथे मोठी कार्यशाळा आहे. अत्यंत संवेदनशील विभाग असलेल्या अग्निशमन दलावर दुर्घटनेतून मुंबईकरांचे प्राण वाचविण्याचे मोठी जबाबदारी असते. त्यामुळे येथील वाहने नियमित दुरुस्त केले जातात. तसेच अत्याधुनिक सुविधा संपन्न अशी अग्निसुरक्षेची सुसज्ज अशी वाहने वेळोवेळी परदेशातून आणल्या जातात. वाहनांची सर्व जबाबदारी अग्निशमन दलात उपप्रमुख अधिकारी ( तांत्रिक ) यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

पुर्वी म्हणजे 1965 च्या आधी प्रत्येक अग्निशमन केंद्रे आपआपल्या वाहनांची दुरुस्ती विभागीय पातळीवर करुन घेत होते. यासर्व वाहनांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व प्रथम 1965 मध्ये तांत्रिकी विभागात केंद्र अधिकारी ( मुख्य कार्यदेशक) हे पद निर्माण केले गेले. या पदासाठी मोटार मॅकेनिकल अभियंताची नियुक्ती केली गेली होती. या पदावरील अभियंता २५ वर्षे सेवेत कार्यरत राहून ते सहाय्यक विभागीय अधिकारी ( कार्यदेशक) पदावरुन निवृत्त झाले. याच दरम्यान 1984 मध्ये महापालिकेच्या शहर अभियंतांनी एका कनिष्ठ अभियंता यांना अग्निशमन दलात नियुक्त केले. पुढे याच कनिष्ठ अभियंतांने मोटार मॅकेनिकल आणि यांत्रिकी विभागातून अभियंता असल्याने त्यांची 1992 या वर्षी अधिकृत निवड पध्दतीने त्यांना केंद्र अधिकारी ( मुख्य कार्यदेशक) पद दिले. ते केंद्र अधिकारी ( मुख्य कार्यदेशक) नंतर सहाय्यक विभागीय अधिकारी आणि पुढे उप प्रमुख अधिकारी ( तांत्रिक) पदावर कार्यरत होते. ते 38 वर्षे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते 2021 या वर्षी निवृत्त झाल्यावर उपप्रमुख अधिकारी ( तांत्रिक) पदावर कोणत्याही अभियंतांची नियुक्ती न करता या पदाची संपूर्ण जबाबदारी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना सोपविण्यात आलेली आहे.

सद्यस्थितीत उपप्रमुख अधिकारी ( तांत्रिक) पदावर कोणाही अभियंताची नियुक्ती न करता कार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांचे एक कॅडेर तयार करण्यात आलेले आहे. या कॅडेरकडे वाहनांची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी सोपविण्यात आलेली असून सर्व दैनंदिन अहवाल ते उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडे सुपूर्द करत आहे.

पण उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना वाहनांबद्दल कोणतेही ज्ञान नाही. ते कोणत्याही यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिकलमधून अभियंता पदवीधारक झालेली नाहीत. वाहनांसंदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडे वाहनांबद्दल दैनंदिन अहवाल सुपूर्द केल्यावर त्यावर कोणत्या आधारावर निष्कर्ष काढून निर्णय घेत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच त्यांना वाहनांबद्दल काडीमात्र ज्ञान नसतानाही परदेशातून वाहन आणण्याची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन उपप्रमुख अधिकारी ( तांत्रिक) पदावर त्वरित अभियंताची नियुक्ती करुन त्यांच्याकडे वाहनांची संपूर्ण जबाबदारी सोपविणे महत्वाचे आहे. अन्यथा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न जाणकरांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here