कंत्राटी जवानांच्या नियुक्तीला तीव्र विरोध

Twitter : @Rav2Sachin

मुंबई :

अग्निशमन दलातील कंत्राटी जवान अग्नि दुर्घटनेत मुंबईकरांचे प्राण वाचवितांना कुठे कमी पडले आणि त्यांचा जीव गेला, तर प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत असून जवानांच्या कंत्राटीकरणाचा तीव्र विरोध होऊ लागला आहे.

मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडे पुरेसे वाहन चालक, जवान आणि सुपरवायझर उपलब्ध नसतानाही मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून तातडीने 22 शीघ्र प्रतिसाद वाहने (Quick Response Vehicle) खरेदी करत या वाहनांचे परिचलन आणि वापरात येण्यासाठी कंत्राटी जवान, वाहन चालक आणि सुपरवायझर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

यासंदर्भात maharashtra.city ने “अग्नि दुर्घटनेत मुंबईकरांच्या जिवाची सुरक्षा कंत्राटी जवानांच्या भरोसे” या मथळयाखाली बातमी प्रकाशित केली होती. या बातमीवर तीव्र पडसाद उमटले आहेत.

अग्निशमन दलातील अधिकारी आणि जवान अत्यंत प्रशिक्षित असतात. तसेच ते त्यांच्या कर्तव्याच्या प्रती अत्यंत समर्पित असतात. मग तुटपुंज्या वेतनात आणि कोणत्याही प्रकारचे लाभ न मिळता काम करणारे कंत्राटी जवान हे आपल्या कर्तव्याच्या प्रती अत्यंत समर्पित राहतील का, असा प्रश्न महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवि राजा यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, जर अग्निशमन दलात पुरेसे मनुष्यबळ नव्हते तर कोट्यवधी रुपयांनी शीघ्र प्रतिसाद वाहन खरेदी करण्याची घाई का केली गेली, यामागे कोणाचा हात आहे, याची प्रथम चौकशी होणे आवश्यक आहे. एक शीघ्र प्रतिसाद वाहन ८ कोटी रुपयांनी खरेदी करण्यात आलेले आहे. इतक्या मोठ्या रक्कमेने खरेदी करण्यात आलेल्या शीघ्र प्रतिसाद वाहनांमध्ये इतकी कोणती साधन सामुग्री आहे, ज्याने हे वाहन ८ कोटी रुपयांनी खरेदी करावे लागले, याची ही चौकशी होणे आवश्यक आहे, अशी मागणी रवि राजा (Ravi Raja) यांनी केली आहे.

मुंबईत कुठेही आगीची घटना घडली, झाड पडले, इमारत कोसळली तर मुंबई अग्निशमन दलाचे जवान (Fire Brigade Jawan) आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचून प्रसंगी जिवाची बाजी लावून मुंबईकरांचे प्राण वाचवतात. कधी कधी त्यांना स्वतच्या प्राणाची आहुती द्यावी लागते. त्यामुळे मुंबईकरांचा जीवाचा जिथे प्रश्न असतो त्या अतिसंवेनशील अग्निशमन विभागात कंत्राटी जवान नेमने कितपत योग्य राहील? विशेष म्हणजे, आपले अग्निशमन जवान आणि अधिकारी आपल्या कामाच्या प्रती समर्पित असतात. मग मुंबईकरांनी या कंत्राटी अग्निशमन जवानांवर किती विश्वास ठेवावा? मुंबईकरांच्या जीवाचे मोल आहे की नाही? असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित करत कंत्राटी जवानांच्या नियुक्तीला विरोध केलेला आहे.

महापालिकेने आता शीघ्र प्रतिसाद वाहनांवर काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने जवान, चालक आणि सुपरवायझर यांची नियुक्ती (appointment of jawan, driver and supervisor on contract basis) केली आहे. परंतु शीघ्र प्रतिसाद वाहनांवर जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कंत्राटी जवान आणि सुपरवायझर यांचा दुर्दैवाने घटनास्थळी मृत्यू झाला तर अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी यांच्याप्रमाणे त्यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबियांना लाभ दिले जाणार का? तसेच त्यांनी प्राणाची आहुती दिली तर त्याच्या परिवाराला सर्व लाभ देऊन त्याच्या कुटुंबातील एकाला नोकरीचा लाभ तरी देणार का ? की केवळ कंत्राटी जवानांचा वापर करून घटनास्थळी त्यांचा मृत्यू वा ते जखमी झाल्यावर त्यांना व त्यांच्या परिवाराला वाऱ्यावर सोडले जाणार आहे ? असे प्रश्न उपस्थित करत आज महापालिका सभागृह सुरू नसल्याने यांना जाब विचारणारे नगरसेवक नाही. त्यामुळे प्रशासन केवळ आपल्या कामातून सत्ताधारी पक्षाची जाहिरातबाजी करण्यासाठी धडपडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव (Rakhi Jadhav) यांनी केला आहे.

दरम्यान, अग्निशमन दलातील कंत्राटी जवानांची नेमणूक ही गरजेची बाब आहे. हे कंत्राटी जवान कायम स्वरुपी नसणार आहे. अग्निशमन दलाने शीघ्र प्रतिसाद वाहने खरेदी केलेली असून या वाहनांवर काम करण्यासाठी कंत्राटी जवानांची नेमणूक केलेली आहे. या जवानांना किरकोळ कामे दिली जाणार असून त्यांच्या सोबत प्रशिक्षित अधिकारी ही असणार आहे. दर सहा महिन्यांनी कंत्राटी जवान बदलेले जाणार आहेत, असे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here