Twitter : @MilindMane70

महाड

किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी एक सदस्यीय चौकशी समिति नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल पंधरा दिवसात अपेक्षित असतांना आज 72 दिवस झाले तरी अहवाल ना आल्याने हे मृत्यू प्रकरण दडपण्यात तर येत नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सोहळ्यादरम्यान दि. 2 जून 2023 रोजी ओमकार दिपक भिसे, (वय 19 वर्षे) रा. संकेश्वर ता. हुकेरी जि. बेळगाव यांचा व दि. 4 जून, 2023 रोजी प्रशांत गुंड, (वय 28 वर्षे) रा. पुणे यांचा मृत्यू झाला. या मृत्यूंच्या घटनांची तीव्रता पाहता या घटनांची समितीमार्फत सखोल चौकशी होणे आवश्यक आहे, या अनुषंगाने डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 अन्वये त्यांना प्राप्त अधिकारानुसार या घटनांची चौकशी करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांची एकसदस्यीय समिती गठीत केली होती. त्यांनी दोन्ही घटनांची सखोल चौकशी करुन अहवाल त्यांच्या अभिप्रायासह तातडीने पंधरा दिवसांत सादर करण्याचे निर्देश चार जून रोजी दिले होते. मात्र, आज या घटनेला 72 दिवस झाले तरीदेखील अहवाल गुलदस्त्यात असल्याची चर्चा आहे.

महाड प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी म्हणून तत्कालीन प्रांताधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड या होत्या. त्यांची बदली झाली, त्यांच्या जागी ज्ञानोबा बानापुरे यांनी पदभार स्वीकारला.

या होत्या चौकशीच्या कार्यकक्षा

1) घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सर्व स्तरावर सखोल चौकशी करणे,

2) शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने घेतलेल्या बैठकांमध्ये दिलेल्या सूचनांची सर्व संबंधित विभागांनी अंमलबजावणी केली अगर कसे? याबाबत चौकशी करणे.

3) सर्व संबंधितांचे म्हणणे दाखल करुन घेणे.

4) सदर घटना या कोणत्याही व्यक्ती अथवा यंत्रणांच्या चुकी अथवा हलगर्जीपणामुळे घडल्या की हा अपघात होता, याबाबत निरीक्षण नोंदविणे

या सोहळयाच्या नियोजनामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही शासकीय विभागाच्या विभाग प्रमुखास चौकशी अधिकाऱ्यांनी साक्ष देण्यासाठी अथवा अहवाल सादर करण्यास बोलाविल्यास त्यांनी तात्काळ हजर राहणे अथवा अहवाल सादर करणे अनिवार्य असेल, कुचराई केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 मधील कलम 51, 55 व 56 अन्वये कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. म्हसे यांनी सूचित केले होते.

याबाबत सखोल चौकशी करून संबंधित यंत्रणेमधील कोणता अधिकारी दोषी होता, हे या अहवालाच्या कारवाईवरूनच सिद्ध होणार आहे. या अहवालानुसार कारवाई झाली तर भविष्यात रायगड किल्ल्यावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान कोणत्याही कामात शासकीय अधिकाऱ्याचा हलगर्जीपणा दिसणार नाही, तसेच भविष्यात शिवभक्तांचे मृत्यू रोखण्यास मदत होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here