Twitter : @maharashtracity

मुंबई

राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी पोस्ट आणि कुरिअरसारख्या यंत्रणांचाही गुन्हेगार वापर करतात अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत लक्ष्यवेधी सुचना उत्तरात दिली. अंमली पदार्थ तस्करीत प्रशासनातील कुणी सापडले तर कलम ३११ चा वापर करून थेट बडतर्फ केले जाईल, असा सणसणीत इशारा फडणवीस यांनी दिला. अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखा (एनसीबी) तसेच दहशतवादविरोधी पथकही (एटीएस) कारवाई करील‌. याससाठी संबंधीत कायद्यातही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) सदस्य रोहित पवार यांनी नियम-१०५ अन्वये यासंदर्भात लक्षवेधी सूचना दिली होती. व्हॉट्सअॅपवर इमोजी पाठवून, जी-पेद्वारे पैसे पेड करून व्यवहार होतो. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त राज्यात येणारे काही विदेशी नागरिक अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्रीत गुंतले असून येथील युवा पिढीला ओढले जात आहे, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधले. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार? असा सवाल त्यांनी केला.

गृहमंत्री फडणवीस उत्तर देताना पुढे म्हणाले, राज्यात अंमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगारांकडून वेगवेगळ्या पध्दतींचा अवलंब केला जातो. पोस्ट, कुरिअर, इंटरनेटवरील डार्कनेटद्वारेही व्यवहार होतात. जलमार्गे अंमली पदार्थ येथे आणले जातात, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

शासन तस्करी रोखण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती देताना फडणवीस म्हणाले, बंदरांवर उतरणाऱ्या कंटेनरमधील सामानाचे कठोरपणे स्कॅनिंग केले जाते, त्यासाठी विशिष्ट स्कॅनर खरेदी करण्यात आले आहेत, कुरिअर व्यवहारासाठी नियमावली करण्यात आली आहे, पोस्टातील कर्मचाऱ्यांनीही संशयित पार्सलबाबत सावधगिरी बाळगावी, याबाबत सुचना देण्यात येत आहेत.

अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अंमली पदार्थांची प्रकरणे हाताळण्याचे अधिकार एनसीबीप्रमाणेच ते एटीएसकडेही असावेत. मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यास वेळ मिळावा यासाठी आरोपपत्र दाखल करण्याची मुदत ९० दिवसावरून १८० दिवस करण्यात यावी. अंमली पदार्थांचा वापर आणि बाळगणे याबाबत जी मर्यादा आहे, त्यामध्ये  बदल करण्यात यावा. अंमली पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक आढळले तर ते विक्रीसाठीच आहेत, असे कायद्याने सिध्द होते. गांजा २० किलो जवळ बाळगण्याची मुभा होती, ती मर्यादा ५ किलोवर आणण्यात आली आहे, असे फडणवीस म्हणाले.

तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येतील. औषध विक्रेत्यांनीही संपूर्ण नोंदी ठेवाव्या, अशा सुचना दिल्या आहेत, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

कॉंग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, भाजपचे समीर मेघे या सदस्यांनी यावेळी चर्चेत भाग घेतला.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here