@maharashtracity

पालिकेच्या निषेधार्थ भाजपाकडून सभा तहकुबीचा अगोदरच
शिवसेनेने चर्चा न करता शोकप्रस्ताव मांडून पळ काढल्याचा भाजपचा आरोप
दुःखद घटनेचे राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न – शिवसेना

मुंबई: मुंबईत (Mumbai) १८ जुलै रोजी तीन ठिकाणी दरड, भिंत, घरे यांच्या पडझडीत ३२ जणांचे बळी गेले. या घटनेचे तीव्र पडसाद आज स्थायी समितीच्या बैठकीत उमटणार होते. भाजपतर्फे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी सभा तहकुब करण्याचा प्रस्ताव अगोदरच देण्यात आला होता. मात्र, सत्ताधारी शिवसेनेने गंभीर विषयावर चर्चा न करता पळ काढत शोक प्रस्ताव मांडून सभा तहकूब केली, असा गंभीर आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.

तर भाजपला (BJP) यानिमित्ताने मृतांच्या टाळूवरील लोणी खायचे होते. भाजप दुःखद घटनांचेही राजकारण करू पाहत असते, असा आरोप करीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपवर पलटवार केला.

त्यामुळे मुंबईत नुकत्याच झालेल्या दुर्घटनांच्या निमित्ताने भाजप व शिवसेना यांच्यात राजकीय आरोप – प्रत्यारोप होऊ लागले आहेत.

मुंबईत १८ जुलै रोजी मुसळधार पावसामुळे चेंबुर, विक्रोळी व भांडुप या ठिकाणी दरड, भिंत, घर कोसळून झालेल्या दुर्घटनांत ३२ निष्पाप नागरिकांचे बळी गेले. या दुर्घटनांना पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप पालिकेतील भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

या दुर्घटनांबाबत दुःख व्यक्त करीत भाजपतर्फे आज स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा घडवून आणून प्रशासनाचा निषेध व्यक्त करून सभा तहकूब करण्याची मागणी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांच्याकडे सभेपूर्वी पत्राद्वारे करण्यात आली होती.

आज दुपारी स्थायी समितीची सभा सुरू झाल्यावर समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, स्वतःच्या अधिकाराचा वापर करीत या दुर्घटनांबाबत शोक व्यक्त करीत कोणतेही कामकाज न करता सभा झटपट तहकूब करण्याचा प्रस्ताव मांडला.

यावेळी, भाजपने त्यांची तहकुबी चर्चेला घेण्याबाबत प्रयत्न केला. मात्र त्यांना समिती अध्यक्ष यांनीच सभा तहकुबी मांडून सभा तहकूब केल्याने भाजपची चांगलीच गोची झाली.

मुंबईत दरडी कोसळून ३२ जण मृत पावल्याच्या घटना घडूनही त्यावर साधकबाधक चर्चा न करता पालिका प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला, असा आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP leader Prabhakar Shind) यांनी केला.

भाजप प्रत्येक घटनेचे राजकारण करते. दुःखद घटनेचेही राजकारण केले जात आहे. त्यामुळे असे घटनाप्रकार म्हणजे मृतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भाजपने दरवेळी दुःखद घटनेचीही राजकारण करू नये,अशा शब्दात यशवन्त जाधव यांनी भाजपवर तोफ डागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here