@maharashtracity

मुंबई: वरळी येथील गॅस सिलिंडर स्फोटाची दुर्घटना (Worli gas cylinder blast incident) व त्यानंतर नायर रुग्णालयात त्यांना उपचार देण्यात झालेला हलगर्जीपणा, जखमी लहान मुलाचा मृत्यू हे दुर्दैवी आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशी घटना कधीही घडू नये अशीच आमची भावना आहे. मात्र मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप व त्यांचे नेते याचे निमित्त करून घाणेरडे राजकारण करीत आहेत.

त्यामुळे ही बाब माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भाजप (BJP) व त्यांच्या नेत्यांनी इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये, अशा शब्दात पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यावर तोफ डागली आहे.

वरळी व नायर प्रकरणाचे पडसाद शुक्रवारी पालिका सभेत उमटले होते. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, या घटनेवरून भाजप नगरसेवकांनी राजीनामे देऊन स्टंटबाजी व घाणेरडे राजकारण केल्याचा आरोप केल्याने भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते व त्यामुळे नगरसेवकही आक्रमक झाले व दोन्ही पक्षाचे नगरसेवक एकमेकांना भिडले होते.

भाजपचे आ. शेलार यांनी, या प्रकरणावरून शनिवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (Shiv Sena) व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप करीत टीका केली. त्याची गंभीर दखल घेऊन यशवंत जाधव यांनी ताबडतोब आपली व शिवसेनेची भूमिका स्पष्ट करीत भाजप व शेलार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेतून शिवसेनेचा द्वेषाने ठासून भरलेला दिसून आला. वास्तविक,आगामी पालिका निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्या नैराश्यातूनच ते आमच्यावर बिनबुडाचे व खोटे आरोप करीत आहेत, असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत शिवसेनाच मदतीला

मुंबईत अनेक घटना घडल्या, आपत्ती आल्या. प्रत्येक वेळी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, गटनेता घटनास्थळी पोहोचतात. तेव्हा आम्ही घटनेचा वॉर्ड आणि तिथल्या नगरसेवकाचा पक्ष बघत नाही. नायरची जी घटना घडली तिथे भाजप नगरसेवक असून त्या तिथे पोहोचल्या नव्हत्या. या घटनेला जबाबदार डॉक्टर, नर्स यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या बडतर्फीची मागणीही आम्ही केली आहे. पीडितांना ज्या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले, ती रुग्णवाहिका यशवंत जाधव यांनी उपलब्ध करून दिली होती.

शेलार व भाजप नगरसेवकात दुमत

पालिकेत भाजपचे ८२ नगरसेवक असून प्रत्येक प्रस्तावाला त्यांचे समर्थन असते. मात्र आज एकही नगरसेवक शेलार यांच्या पत्रकार परिषदेत बोलला नाही. फक्त शेलार स्वतःच बोलले. त्यामुळे त्यांच्यात व त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांत एकमत नाही. तसेच, भाजप नागरसेवकांत अपेक्षित क्षमता नाही किंवा शेलार यांचा त्यांच्यावर विश्वास नाही. यापैकी खरे काय ते भाजपनेच ठरवावे, असे यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.

शेलार यांनी केलेल्या प्रत्येक टीकेचा समाचार घेत यशवंत जाधव यांनी सडेतोड उत्तर दिले. महापालिका दरवर्षी ४ हजार ५०० कोटी रुपये आरोग्यावर खर्च करते हे खरे आहे. मुंबईच्या रुग्णालयात फक्त मुंबईतील रेशन कार्डधारकांवर उपचार केले जात नाहीत. देशभरातून नागरिक उपचारांसाठी येथे येत असतात, हे शेलार यांनी लक्षात घ्यावे. या सर्वांना मुंबई सामावून घेते. आणि त्यांना बरे करूनच घरी सोडते.

भाजपकडून उठसुट स्थायी समिति अध्यक्ष यांच्यावर कोर्टात केस केली जाते. जर एखादे कंत्राट चुकिचे असेल तर भाजप प्रशासनविरोधात कोर्टात का जात नाही ह्याचे उत्तर शेलार देतील का ? असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here