भाजपा आ.नितेश राणे यांचा घणाघात

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून वादंग निर्माण करत संविधानिक संस्था, पदांविषयी अविश्वास निर्माण करून जनतेची दिशाभूल करण्याच्या शहरी नक्षलवाद्यांच्या कुटनीतीचा वापर करणारे खा. संजय राऊत देशद्रोह करत आहेत, अशी घणाघाती टीका भाजपा आ. नितेश राणे यांनी बुधवारी प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. यावेळी आमदार राम सातपुते, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.

आ.राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा जगभरात गौरव होत आहे. मोदी आणि भारताचा सन्मान होत असल्याचे खा. राऊत यांना पाहवत नाही. म्हणून असुयेपोटी नव्या संसद भवनाची गरज नाही, राष्ट्रपतींचा अवमान केला जातो,अशी फुटकळ चर्चा घडवली जाते. सुमित्रा महाजन लोकसभेच्या अध्यक्ष असताना सर्वानुमते नव्या संसद भवन उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळची शिवसेना एनडीए चा घटक पक्ष होती. तो निर्णय खा. राऊत यांच्या सारख्याना चुकीचा वाटू लागतो हे अनाकलनीय आहे असेही आ. राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचवेळी नव्या संसद भवनाच्या उभारणीवर टीका करणाऱ्या खा. राऊत यांनी उद्धव ठाकरेंना नव्या मातोश्री बांधणीची काय गरज भासली असं विचारलं होत का,असा सवालही आ. राणे यांनी केला.

जयंत पाटील व अजित पवार यांच्यात भांडण लावून राष्ट्रवादी फोडण्याचा खा. राऊत यांचा डाव असल्याचे आ. राणे म्हणाले. जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ ‘सामना’चा अग्रलेख लिहीला जातो. मात्र अजित पवारांच्या समर्थनात साधा लेखही लिहीला जात नाही, उलट त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध केल्या जातात, असेही आ. राणे यांनी नमूद केले.

जयंत पाटील यांच्यावर भाजपा प्रवेशासाठी दबाव टाकण्यासाठी ईडी कारवाई केली जाते, अशी टीका करणाऱ्या खा. राऊत यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावर झालेल्या कारवाई बद्दलही असेच बोलावे, असेही आव्हान आ. राणे यांनी दिले. दहशतवादी दाऊद इब्राहीमच्या हस्तकांना साथ दिल्याबद्दल नवाब मलिक यांना अटक झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हत्येचा कट रचणाऱ्या दाऊदला मदत करणाऱ्या मलिक यांची बाजू घेणाऱ्या खा. राऊत यांचा खरा चेहरा यातून दिसतो आहे,असा टोलाही आ. राणे लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here