शिवसेना आमदाराचा दावा

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भाजपसोबत राज्यात सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असून, शिंदे गटातील शिवसेनेच्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या नाराजी नाट्यानंतर बुधवारी उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व आमदार,खासदार, व पदाधिकारी यांची बैठक घेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. दरम्यान, अशाच प्रकारची नाराजी भाजपच्या आमदारांमध्ये देखील असल्याचा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी गुरुवारी येथे केला.

संजय शिरसाट काय म्हणाले?

सत्तेची काही पदं गेल्यावर आमदारांमध्ये नाराजी असते आणि हे साहजिकच आहे. याला तुम्ही नाराजी किंवा बंडखोरी म्हणू शकत नाही. त्यांनी नाराजी दाखवणे हे सत्य आहे. आता हा प्रकार फक्त एकट्या शिवसेनेत (शिंदे गटात) झाला आहे आणि भाजपमध्ये झाला नाही, अशातला भाग नाही. भाजपचे देखील १०६ आमदार आहेत. काही अपक्ष त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांच्यात देखील नाराजी थोडीफार चालणारच आहे. मात्र या दोन्ही पक्षाच्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता करू नका असे सांगितले आहे. तर आपण योग्य तो निर्णय योग्य त्यावेळी घेऊ असे देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले.

राज्यातील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे आपली इच्छा बोलून दाखवली आहेच. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच कोणी उघडपणे चर्चा केलेली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here