@maharashtracity
धुळे: येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी, स्वच्छता मिशन कक्ष तसेच सुवर्णगिरी दुर्ग सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे माझी वसुंधरा अभियान टप्पा दोन अंतर्गत लोकसहभागातून सुवर्णगिरी किल्ल्यावर (Suvarnagiri Fort) दुर्ग संवर्धन, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या वेळी मोहिमेत सहभागींना हरित शपथ देण्यात आली. या मोहिमेत स्वच्छतेसह दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली.
सोनगीर येथील सुवर्णगिरी गड किल्ल्यांवर पर्यावरण संवर्धन व संरक्षणासाठी गेल्या वर्षापासून माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत आहे. यंदा ५ जून ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत अभियान सुरू आहे. यामध्ये भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश संवर्धनावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. यानंतर सुवर्णगिरी किल्ल्यावर भगवा झेंडा लावून पायथ्यापासून कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली.
यावेळी धुळे जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पवार, विस्तार अधिकारी कपिल वाघ, सरपंच रुख्माबाई गोरख ठाकरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष महेश वाघ, ग्रामीण प्रमुख प्रसाद उपासणी, दुर्ग सेवक कृणाल थोरात, वेदांत देवरे, ज्योती देवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, हरीत समितीचे अध्यक्ष डॉ.राहुल देशमुख, आदी उपस्थित होते.