X : @Rav2Sachin
मुंबई : अलिकडेच वडाळा फायर स्टेशनचे फायर इंजिन MP – ३३ ही गाडी भायखळा वर्कशॉप येथून वडाळा आरटीओ येथे पासिंग करायला जात असताना पूर्व द्रुतगती मार्गावर अचानक पेट घेतला होता. आता पुन्हा एकदा शुक्रवारी पहाटे अशीच घटना घडली. पण यावेळी जी फायर इंजिन आग विझविण्यासाठी गेली होती त्याच वाहनालाच घटना स्थळी आग लागल्याने अग्निशमन दल अवाक् झाले आहे. सुदैवाने कोणतेही जीवित्तहानी झाली नाही.
पण “तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारी सांभाळतो वाहनांची जबाबदारी!”
( https://www.maharashtra.city/breaking-news/mumbai-news-non-technical-deputy-chief-fire-officer-is-in-charge-of-the-vehicles/) या मथळ्याखली प्रकाशित केलेल्या बातमीद्वारे अग्निशमन दलाचे वाहने व्यवस्थित न पडताळल्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून मुंबईकरांच्या जीवाला धोका ही होऊ शकतो, ही बाब उजेडात आणली होती. ही शक्यता पुन्हा एकदा खरी ठरली.
अलिकडे वडाळा फायर स्टेशनचे फायर इंजिन MP – ३३ ही गाडी भायखळा वर्कशॉप येथून वडाळा आरटीओ येथे पासिंग करायला जात असताना पूर्व द्रुतगती मार्गावर अचानक पेट घेतला. मात्र यंत्राचालकाच्या सावधगिरीमुळे गाडीला लागलेली आग विझविण्यात यश मिळाले. आगीचा थरार हा अर्धातास पूर्व द्रुतगती सुरु होता. सुदैवाने कोणतेही जीवित्तहानी घडली नाही.
आता शुक्रवारी ( 5 एप्रिल 2024 ) पहाटे पावणे चारच्या सुमारास सांताक्रुझ स्मशानभूमी मध्ये आग लागल्याची घटना घडली. यावेळी अंधेरी फायर स्टेशन मधील फायर इंजिन आग विझवण्यासाठी घटना स्थळी रवाना झाली. स्मशान भूमीच्या लाकडांना आग लागली होती. आग विझवत असताना फायर इंजिन मधून धूर येऊ लागला. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तोवर अग्निशमन जवानांनी आगीवर अर्ध्याहून अधिक नियंत्रण मिळवले होते. पण फायर इंजिन मधून धूर येत असल्याने जवानांनी आग विझवणे बंद केले. तितक्यात फायर इंजिनमध्ये एक स्फोट झाला आणि आग लागली. सुदैवाने वांद्रे फायर स्टेशनची फायर इंजिन घटना स्थळी होती. या फायर इंजिनने स्मशान भूमीच्या लाकडांना लागल्या आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, महाराष्ट्र सिटी (Maharashtra.city) ने प्रकाशित केलेल्या बातमीत नमूद केले होते की, 1965 च्या आधी प्रत्येक अग्निशमन केंद्रे आपआपल्या वाहनांची दुरुस्ती विभागीय पातळीवर करुन घेत होते. यासर्व वाहनांची जबाबदारी पार पाडण्यासाठी सर्व प्रथम 1965 मध्ये तांत्रिकी विभागात केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) हे पद निर्माण केले गेले. या पदासाठी मोटार मॅकेनिकल अभियंताची नियुक्ती केली गेली होती. या पदावरील अभियंता २५ वर्षे सेवेत कार्यरत राहून ते सहाय्यक विभागीय अधिकारी (कार्यदेशक) पदावरुन निवृत्त झाले.
याच दरम्यान 1984 मध्ये महापालिकेच्या शहर अभियंतांनी एका कनिष्ठ अभियंता यांना अग्निशमन दलात नियुक्त केले. पुढे याच कनिष्ठ अभियंतांने मोटार मॅकेनिकल आणि यांत्रिकी विभागातून अभियंता असल्याने त्यांची 1992 या वर्षी अधिकृत निवड पध्दतीने त्यांना केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) पद दिले. ते केंद्र अधिकारी (मुख्य कार्यदेशक) नंतर सहाय्यक विभागीय अधिकारी आणि पुढे उप प्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर कार्यरत होते. ते 38 वर्षे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते 2021 या वर्षी निवृत्त झाल्यावर उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर कोणत्याही अभियंतांची नियुक्ती न करता या पदाची संपूर्ण जबाबदारी उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना सोपविण्यात आलेली आहे.
उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांना वाहनांबद्दल कोणतेही ज्ञान नाही. ते कोणत्याही यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिकलमधून अभियंता पदवीधारक झालेली नाहीत. वाहनांसंदर्भात कोणतेही ज्ञान नसलेल्या उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्याकडे वाहनांबद्दल दैनंदिन अहवाल सुपूर्द केल्यावर त्यावर कोणत्या आधारावर निष्कर्ष काढून निर्णय घेत असतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच त्यांना वाहनांबद्दल काडीमात्र ज्ञान नसतानाही परदेशातून वाहन आणण्याची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे. त्यामुळे याबाबत पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदावर त्वरित ऑटो मोबाईल कार्यकारी अभियंताची नियुक्ती करुन त्यांच्याकडे वाहनांची संपूर्ण जबाबदारी सोपविणे महत्वाचे आहे. अन्यथा पुन्हा भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न जाणकरांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, घडलेल्या दुर्घटनेतून आता तरी पालिका प्रशासनाने धडा घेऊन तांत्रिक ज्ञान नसलेला उपप्रमुख अग्निशमन अधिकारीच्या जागेवर पूर्वी प्रमाणे (५८ वर्षे) अग्निशमन दलातील सर्व वाहनांची जबाबदारी उपप्रमुख अधिकारी (तांत्रिक) पदाकडे देऊन या पदावर मोटार मॅकेनिकल अभियंताची नेमणूक करुन त्यांच्या हाताखाली यांत्रिकी आणि मोटार मॅकेनिक अभियंतांची कनिष्ठ, दुय्यम आणि सहाय्यक अभियंता पदी नेमणूक करुन एक सक्षम पथक तयार करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.
Also Read: MAHARASHTRA.CITY च्या बातम्यांची दखल घेतली उपायुक्तांनी; अग्निशमन दलाकडून मागितला अहवाल