Twitter: @maharashtracity

मुंबई: मुंबईची लोकसंख्या सुमारे दोन कोटी असताना एमबीबीएससाठी स्थानिक विद्यार्थ्यांना केवळ 100 जागा उपलब्ध होतात, पर्यायाने मुंबईत लोकसंख्येच्या प्रमाणात फॅमिली फिजिशियन उपलब्ध होत नाहीत, याकडे भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.

विधानसभेत अर्थसंकल्पाची खातेनिहाय चर्चा सुरु असून या चर्चेत सहभागी होताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील एका गंभीर विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले. एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात मुंबईत जनरल फिजिशियनची संख्या अपूरी आहे. संस्थेने शोधले आहे त्यानुसार मुंबईतील एकुण 700 एमबीबीएस जागेपैकी 600 जागा गुणवत्तेनुसार तर केवळ 100 जागा स्थानिक विद्यार्थ्यांना मिळतात. त्यातील 60 विद्यार्थीच मुंबईत प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा देतात. 

नवी दिल्लीची लोकसंख्या अडिच कोटी असताना स्थानिक विद्यार्थ्यांना 800 जागा मिळतात, चेन्नईची लोकसंख्या एक कोटी- जागा 300,  कलकत्ता दिड कोटी – जागा 400 तर मुंबईची लोकसंख्या अडिच कोटी असताना केवळ 100 जागा उपलब्ध होतात. त्यामुळे त्याचे परिणाम आरोग्य सेवेवर होतात, असे आशिष शेलार म्हणाले.

गुणवत्ता हा निकष असायलाच हवा, संपूर्ण देशातील विद्यार्थी कुठेही शिकू शकतो. पण  याबाबत मुंबईत असलेली विषमता दूर करण्यासाठी सरकारने लक्ष देण्याची गरज आहे, अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी केली. याचवेळी अन्न पुरवठा विभागावर बोलताना त्यांनी मुंबईत रेशनिंग दुकाने कमी होत असून भाडे परवडत नाही म्हणून दुकाने कमी होत आहेत. त्यामुळे सरकारने रेशनिंग दुकानांना भाडे वाढवून द्यावे, तसेच वस्तीमध्ये फिरती रेशनिंग दुकाने सुरु करण्यात यावी, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here