@maharashtracity
धुळे: मुंबई- आग्रा महामार्गावर भरधाव इंर्टिका कार उलटून झालेल्या भिषण अपघातात ३ तरुण ठार तर ५ जबर जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी भल्या पहाटे दिड ते दोन वाजेच्या सुमारास बाभळे शिवारात जलशुध्दीकर केंद्राच्या जवळ घडली आहे.
मयत आणि जखमी तरुण हे औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर धुळ्याच्या हिरे वैद्यकिय महाविद्यालयाच्या (Hirey Medical college) जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे, तर मृतदेह सुध्दा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
कन्नड तालुक्यातील बचत गटाच्या फायनान्सचे काम करणारे तरुण हे इंर्टिका कार क्र. एमएच २२-यु.७१२८ याने मध्यरात्री मध्यप्रदेशातील (MP) इंदौर (Indore), उजैन (Ujjain) येथे दर्शनासाठी निघाले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरुन (Mumbai – Agra National Highway) जात असतांना धुळ्याहून पुढे गेल्यावर भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटून कार पलटली.
वेगात असल्याने कार ४ ते ५ पलट्या घेत रस्त्याच्या कडेला जावून धडकली. यात कारमध्ये बसलेल्या तीन जणांचा जबर जखमी झाल्याने जागीच ठार झाल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.
मृतांमध्ये पवन विजय जाधव (वय २४), गणेश भगवान हिरे (वय २८) आणि सचिन सुभाष राठोड (वय २३) रा.उंबरखेडा ता.कन्नड यांचा समावेश आहे. तसेच सागर समाधान पाटील (वय २३), नवनाथ आण्णा बोरसे (वय २६), शिवाजी जग्गु जाधव (वय २६), किशोर आसाराम राठोड (वय २४) आणि गाडी चालक गौरव कांबळे रा. गिरजा मंगल कार्यालयाजवळ, कन्नड जि.औरंगाबाद हे जबर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या उपचार सुरु असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना धुळे पेालिसांनी संपर्क साधून माहिती दिली आहे.
दरम्यान, आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास अपर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतली. यावेळी शिरपुर डिवायएसपी माने, पो नि सुनिल भाबड, एस आय गजानन गोटे, एस आय हमित पठाण, पो कॉ सुशिलकुमार गांगुर्डे, पो कॉ विनोद सोनवणे, विजय पाटील, प्रभाकर सोनवणे, माळी आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.