मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

Twitter : @maharashtracity

अहमदनगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. त्यांच्या नावामुळे जिल्ह्याचा मान मोठा होणार असल्याचेही ते म्हणाले.

चौंडी ता. जामखेड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले आपले राज्य असून या भूमीचा वसा आणि वारसा वाहणाऱ्यांची मोठी मांदियाळी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्याकाळात जमीन, महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी जन्म घेतलेल्या या मातीचे आपल्यावर खूप मोठे ऋण असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

सर्वसामान्यांना न्याय देणारे हे सरकार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांच्या हितासाठी शासनाने अनेक निर्णय  घेतले आहेत. केंद्र शासनाच्या धरतीवर राज्य शासनाने “नमो शेतकरी सन्मान योजना” सुरू केली असून केंद्र शासनाचे सहा हजार व राज्य शासनाचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सहकारी तत्त्वावरील महामंडळासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अहिल्यादेवी होळकरांनी  न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली – उपमुख्यमंत्री 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची ज्योत पेटवली. आपला आत्माभिमान, आत्मविश्वास व आत्मसन्मान जागृत करून हिंदवी स्वराज वाढवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले. अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी स्व पैशातून केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने मेंढपाळांसाठी कर्ज योजना मंजूर करत त्यांच्यासाठी पावसाळ्यात चराई रान राखून ठेवण्याचा निर्णय घेतला. राज्यातील धनगर वाड्यांना मुख्य रस्त्यांशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली. धनगर समाजातील व्यक्तींसाठी दरवर्षी 25 हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here