Twitter : @NalavadeAnant
मुंबई
राज्यातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यासही राज्य सरकारचे प्राधान्य असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण १२ रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण तसेच सुशोभिकरणाच्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आला.
जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने रोजगार, आरोग्य, शिक्षण, दळणवळण यांसह मूलभूत सोयीसुविधा जनसामान्यांना सुलभतेने उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशाच्या, राज्याच्या गतिमान विकासात रस्त्यांची व्यापक सुविधा ही महत्त्वाची बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आठशे रेल्वे स्थानकांच्या कायापालटाच्या उपक्रमाची अलीकडेच सुरुवात केली आहे. राज्यातील ४४ स्थानकांचा त्यात समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गगरी, कुडाळ आणि सावंतवाडी रेल्वेस्थानक यांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सुरु होत आहे, ही स्वागतार्ह बाब आहे. यामुळे कोकणाच्या पर्यटनाचा व्यापक विस्तार होण्यासाठी निश्चितच लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यटकांना, स्थानिक रहिवाशांना या माध्यमातून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. त्याचसोबत कोकणातील पर्यटनवृद्धीलाही यामुळे मोठी चालना मिळेल. पर्यटन व्यवसायाला पूरक निर्सगसौंदर्याने संपन्न कोकणाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास ही काळाची गरज असून, सरकारने कोकण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे, असेही शिंदे यांनी यावेळी नमूद केले.
![](https://www.maharashtra.city/wp-content/uploads/2023/08/cm-on-konkan1.jpg)
रेल्वे स्थानकांचे रस्तेही महत्त्वपूर्ण
कोकण हे पर्यटनाच्या दृष्टीने सुंदर ठिकाण असून स्थानिक रोजगार संधी विस्तारण्यासाठी कोकणातील बारा रेल्वे स्थानकांच्या रस्ते काँक्रिटकरण आणि सुशोभीकरणाचे काम निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्याठिकाणी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी स्वतंत्र विकास मंडळ करण्याची मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कोकणाला नैसर्गिक साधनसंपत्ती लाभली असून त्या ठिकाणच्या या साधनसंपत्तीचा, सागरी किनारे यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कोकण रेल्वे ही कोकण विकासाची जीवनवाहिनी असून तेथील रेल्वे स्थानकांचा कायापालट झाला पाहिजे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
कोकण रेल्वे स्थानकांच्या रस्ते सुशोभिकरण कामासाठी लागणारा १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे. या कामात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसेच कोकण रेल्व व्यवस्थापनाने मोलाचे सहकार्य केल्याने हा उपक्रम कमी कालावधीत सुरु करता येत आहे. संबंधित रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण कामाची सुरवात हा कोकण पर्यटन विकासातील महत्वाचा टप्पा आहे. कोकणातील जिल्ह्यांना याचा निश्चितच व्यापक लाभ मिळेल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
![](https://www.maharashtra.city/wp-content/uploads/2023/08/cm-on-konkan2-1024x574.jpg)
सुविधायुक्त स्थानकांची निर्मिती
कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मडुरे रेल्वे स्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाचे आणि सतत प्रवाशांची वर्दळ असणारे १२ रेल्वे स्थानकांचे काम पहिल्या टप्प्यात प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील वीर, माणगाव आणि कोलाड; रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी या चार रेल्वे कामांना राज्य सरकार मार्फत मंजूरी प्रदान केली आहे.
रेल्वे स्थानक सुशोभीकरण अंतर्गत रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, पथदिवे, पेव्हड शोल्डर आणि आर.सी.सी. गटर्स बांधणे, महिला आणि पुरुष प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी करण्याचे काम अंतर्भूत आहे. प्रवाशांसाठी स्थानक परिसरात दुकाने उभारणे, अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतीक्षालयाची व्यवस्था करणे, ऊन पाऊस यांच्यापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी छत तयार करण्यात येणार आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी आगमन निर्गमनाद्वारे सायकल दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात येणार आहे.