निर्बंध पुढील आठवड्यात होणार शिथिल
मुंबई: मुंबई शहर ब्रेक द चैन अंतर्गत तिसऱ्या स्तरावरून दुसऱ्या आणि आता पहिल्या स्तरावर आले आहे. मात्र एवढ्यावर समाधानी राहून जास्त शिथिलता दिल्यास व रेल्वे प्रवास करण्यास सर्वांना मुभा दिल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती पालिकेला वाटत आहे. त्यामुळेच मुंबईकरांना एवढ्यात रेल्वे प्रवास घडणार नाही. कदाचित आणखीन काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मात्र ब्रेक द चैन अंतर्गत घालण्यात आलेल्या निर्बंधात पुढील आठवड्यात कोरोनाबाबतच्या स्थितीचा अचूक अंदाज घेऊन शिथिलता आणण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट सध्या ३.७९ टक्के असून २३.५६ टक्के ऑक्सिजन बेडवर रुग्ण असल्याने मुंबईचा समावेश दुसऱ्या स्तरावरून आता पहिल्या स्तरात झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने मुंबईमध्ये तिसऱ्या स्तराचेच निर्बंध लागू ठेवले आहेत. हे निर्बंध आठवडाभर लागू राहतील.
“येत्या चार आठवड्यात मुंबईमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने मुंबईमध्ये लोकल ट्रेनमधून सर्वसामान्य नागरिकांना प्रवासाची मुभा देता येणार नाही. मुंबईमध्ये लोकल ट्रेनने लांबून लोक येतात. ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असते.
लोकल ट्रेनमधून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिल्यास कोरोनाचा प्रसार होण्याची भीती असल्याने सध्या तरी लोकल ट्रेनमधून प्रवासाची मुभा देणे शक्य होणार नाही,” असे सुरेश काकाणी यांनी संगितले.