@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) प्रसूतिगृहात चार दिवसात चार लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने भाजपने (BJP) याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे स्थानिक खासदार व नगरसेवक मनोज कोटक (BJP MP Manoj Kotak) यांनी केली आहे.
भाजपतर्फे पोलिसात दाखल तक्रारीत भाजपचे नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी, नगरसेविका समिती कांबळे, जागृती पाटील, सारिका पवार, साक्षी दळवी यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.
पालिकेच्या प्रसूतिगृहात चार लहान बालकांचा बळी गेल्यानंतरही रूग्णालय व पालिका प्रशासन आवश्यक कारवाई व उपाययोजनांबाबत ठोस पावले उचलताना दिसत नाही. राज्याचे आरोग्य मंत्री, महापौर, पालिकेचे आरोग्य अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांच्यापैकी कोणीही आतापर्यंत घटनास्थळी साधी भेट देऊन पाहणी केली नाही की चौकशीही केलेली नाही, अशी खंत खा. कोटक यांनी यावेळी व्यक्त केली.
पालिका प्रशासन असेच हातावर हात धरून बसणार असेल तर भाजप हे सहन करणार नाही. मुजोर प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.