@maharashtracity

मुंबई: पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते अशीच मुंबईची ओळख सातत्यानं प्रसारमाध्यमे देतात. परंतु या तुंबलेल्या मुंबईत अनेकांनी आपले हकनाक जीव गमावले तरीही त्यावर ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत (BMC) दिर्घकाळ सत्ता भोगणारी शिवसेना (Shiv Sena) मात्र काहीही करू शकलेली नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केली आहे.

मुंबईला नुसती ठेकेदारांच्या फायद्यासाठी रंगरंगोटी आणि देखावा करून गतवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी जनतेच्या मुळ समस्येकडेपण लक्ष दिले पाहिजे, असा सल्ला राणे यांनी शिवसेेनेला दिला आहे.

यंदा मान्सून (Monsoon) वेळेच्या आधी पोहोचण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. याबाबत बोलतांना नितेश राणे म्हणाले, यावर्षी चांगला पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईची काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही.

ते पुढे म्हणाले, तुंबणाऱ्या या मुंबईत ३८६ असे धोक्याचे ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस (Flooding Points) म्हणतो. यापैकी २८ ठिकाणं एकाच पश्चिम विभागातील आहेत. फक्त मांटुंगा, वडाळा, सायन भागातच यातील २५ फ्लडींग पॉईंट्स आहेत. यंदाच्या पावसाळ्यात समुद्राला २२ दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग २५० मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला २६ जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती व्यक्त केली जातेय.

पावसाच्या पाण्याचा निचरा या फ्लडींग पॉईंट्स येथून झाला नाही तर मुंबईकरांना भीषण परिस्थितीचं तोंड द्यावं लागेल. या फ्लडींग पाईंट्स येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावण्याच्या पलिकडे आपण काय उपाय योजना केल्या आहेत? हे आम्हा जनतेस कळाले पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली.

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? या सर्व प्रश्नांची आपण समाधान साधणार आहात की नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here