By डॉ. नितीन राऊत 

सामाजिक परिवर्तनाच्या (social reforms) प्रक्रियेने एक विशिष्ट वर्ग आणि विशिष्ट विचारांचे लोक नेहमीच अस्वस्थ होतात. त्यामुळे  परिवर्तनाच्या घटनेचा विसर पडावा म्हणून हा वर्ग नेहमीच प्रयत्न करतो.  ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (Dr Babasaheb Ambedkar) महापरिनिर्वाण झाले. मात्र याच तारखेला म्हणजे ६ डिसेंबर १९९२ साली बाबरी मस्जिद (Babri Masjid) पाडण्यात आली.  हिंदू – मुस्लीम (Hindu – Muslim) दंगली (riots) घडविण्यात आल्या.  ६ डिसेंबर हा दिवस जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  महापरिनिर्वाण दिवस लोकांच्या लक्षात राहू नये असा कुटील प्रयत्न मनुवाद्यांनी केला.

भीमा कोरेगाव (Bhima Koregaon)  येथे १ जानेवारी १८१८  साली घडलेल्या ऐतिहासिक  क्रांतिकारक घटनेची आठवण पुसून काढण्यासाठी असेच प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये जातीय तेढ निर्माण करून या ऐतिहासिक घटनेला विस्मरणात नेण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र बाबासाहेबांचे अनुयायी हा क्रांतिकारी इतिहास कधीच विसरणार नाही आणि विसरूही देणार नाही. 

 या क्रांतिकारी घटनेची विविध माध्यमातून आठवण करून देणाऱ्यांना सध्या लक्ष्य केले जातेय. त्यांचा आवाज दडपला जातोय. काहींना तुरूंगात डांबून छळले जातेय. भीमा कोरेगावच्या लढवय्यांच्या वंशजांनी त्यांची प्रेरणा घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील तत्कालीन पेशवाईच्या (Peshwai) विचारांविरूद्ध लढा दिला आणि आजही ते लढतच आहेत.

गावकुसाबाहेर ढकलण्यात आलेल्या या समाजाला नेहमीच विकासाच्या प्रकाशापासून दूर ठेवण्यात आले. हा समाज नेहमीच अंधःकारात राहावा, अशी काळजी आधुनिक पेशवाई घेत असते. ज्यांनी याविरूद्ध आवाज उठवला त्यांची गळचेपीही केली गेली. दुष्यंत कुमारांनी वर्णन केलेल्या स्थिती सारखी स्थिती निर्माण केली जातेय.

कहाँ तो तय था चिराग़ाँ 

हर एक घर के लिए

कहाँ चिराग़ मयस्सर नहीं 

शहर के लिए

वो मुतमइन हैं कि 

पत्थर पिघल नहीं सकता

मैं बेकरार हूँ 

आवाज़ में असर के लिए

तेरा निजाम है सिल दे 

ज़ुबान शायर की

ये एहतियात जरूरी है 

इस बहर के लिए

१ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे दुसरे बाजीराव पेशवे (Peshwa) आणि ब्रिटिश (British) सैनिकांच्या युद्धात ब्रिटीशांनी पेशव्यांच्या खूप मोठ्या सैन्याचा पराभव केला. अवघे ८०० सैनिक असलेल्या ब्रिटीश सैन्याने जवळपास  २८ हजार सैन्य असलेल्या पेशव्यांच्या सेनेचा पराभव केला.

ब्रिटीश सैन्यात असलेल्या महार समाजातील सैनिकांनी पेशवाईच्या जुलमी सत्ता संपविण्यासाठी प्राणाची बाजी लावली. ब्रिटीशांच्या बाजूने महार सैनिकांसोबत मराठे (Maratha) व इतर सैन्यही होते. यात जवळपास २०० महार सैनिक शहीद झाले. महार व मराठे सैनिक पेशव्यांविरूद्ध का लढले? हा एक स्वाभाविक प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण होतो. 

पेशवाईत मनुस्मृतीच्या आधारे दलितांवर कमालीचे अत्याचार केले जात होते. आपल्या पूर्वजांना गुलामांपेक्षा, जनावरांपेक्षाही वाईट वागवले जात होते. आपल्या पूर्वजांची सावली, त्यांचा स्पर्श झालेल्या मातीचाही विटाळ मानला जायचा.छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) शिकवणीप्रमाणे रयतेला आपली संतती मानून ही पेशवाई काम करीत नव्हती. त्यामुळे ही सर्वसमावेशक मराठेशाही नव्हती तर जातीयवादी पेशवाई होती.

मराठ्यांसोबतच महार समाजातील लढवय्यांचा समावेश असलेल्या तुकडीनं पेशवाईचा पराभव केला. पेशव्यांनी जबरदस्तीनं अमानवीय अस्पृश्यता लादल्यानं महार समाजामध्ये प्रचंड असंतोष धगधगत होता.  शिवाजी महाराजांनी अस्पृश्यता नाकारून लढवय्या महार समाजासोबत इतर जाती धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात भरती केलेलं होत. मात्र पेशव्यांनी महार समाजाला अस्पृश्य ठरवून त्यांचा अतोनात छळ केला. त्यांना सैन्यात भरती होण्यास बंदी घातली. अत्याचारी कारभार करणाऱ्या पेशव्याविरूद्ध म्हणूनच मराठा समाजही जीवाची बाजी लावून लढला हे आपण विसरू नये.

ही लढाई महार समाजाची मराठ्यांविरुद्धची लढाई कधीच नव्हती. महार आणि मराठा यांच्यादरम्यान मतभेद किंवा संघर्षही कधीच नव्हता. इतिहासात अशा वादावादाची उदाहरणंही नाहीत. पेशव्यांनी अस्पृश्यतेची अमानवीय प्रथा बंद केली असती आणि शिवरायांच्या पद्धतीने राज्य कारभार केला असता तर ही लढाई कदाचित झालीच नसती असे मला वाटते. या घटनेला दुजोरा देणारे पुरावे तत्कालीन इतिहास लेखनात उपलब्ध आहे. जेम्स ग्रांट डफ (James Grant Duff) यांनी आपल्या ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज’ (A History of Marathas) या पुस्तकात या लढाईचा उल्लेख केला आहे.

ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) या तुकडीत भारतीय वंशाचे सैनिक मोठया संख्येने होते. महार जातीचे सैनिक बॉम्बे नेटिव्ह इन्फॅन्ट्री (Bombay Native Infantry) विभागाशी संलग्न होते, अशी माहिती उपलब्ध आहे.  म्हणूनच ही घटना दलित चळवळीच्या (Dalit Movement) इतिहासात महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं दलित कार्यकर्ते मानतात.  हेन्री टी प्रिंसेप यांच्या ‘हिस्टरी ऑफ द पॉलटिकल अँड मिलिट्री ट्रान्जॅक्शन्स इन इंडिया’ (History of The Political And Military Transactions) या पुस्तकात या लढाईचा संदर्भ आहे. महार समाजातल्या माणसांचा समावेश असलेल्या ईस्ट इंडिया तुकडीच्या धाडसाचं वर्णन या पुस्तकात आहे.

पेशवाईला संपविल्याशिवाय अस्पृश्यता नष्ट करता येणार नाही, आपल्या समाजाचा छळ थांबविता येणार नाही, हे पटलेल्या महार समाजातील लढवय्यांनी इंग्रजांच्या बाजूने लढून पेशवाईचा अंत केला.  क्रूर व अत्याचारी पेशवाईवरील या विजयाच्या स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आला.

या स्तंभाच्या देखभालीचे काम ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यदलात कार्यरत आणि पेशवाईविरूद्ध लढताना जखमी झालेले सैनिक खंडोजी माळवदकर या मराठा समाजातील लढवय्यास सोपविण्यात आले होते.  त्यांनी व त्यांच्या वारसांनी विजयस्तंभाच्या देखभालीचे काम आजवर केले आहे व करीतही आहेत.

बाबासाहेबांनी केली सार्वजनिक जीवनाची सुरूवात

या घटनेला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनन्य साधारण महत्व दिले आहे. म्हणूनच १ जानेवारी १९२७  रोजी त्यांनी भीमा कोरेगाव येथे जाऊन विजय स्तंभाला अभिवादन केले व येथूनच आपल्या सामाजिक समतेच्या चळवळीला प्रत्यक्ष सुरुवात केली. बाबासाहेबांनी या स्थळाला देशभरातील दलितासाठीचे प्रेरणास्थळ ठरवले.  हे स्थळ म्हणजे शौर्य भूमी असल्याचा गौरव केला. 

विजयस्तंभापासून प्रेरणा घेत त्यांनी समाजातील अस्पृश्यता संपविण्यासाठी  मार्च महिन्यात महाडच्या (Mahad) चवदार तळ्याचे  क्रांतिकारी आंदोलन  केले. भीमा कोरेगावच्या विजयाची आठवण म्हणून  देशात सामाजिक समतेला मानणारे धर्मनिरपेक्ष विचारांचे लाखो लोक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीमा कोरेगाव येथे येतात. यामुळे मनुवादी अस्वस्थ झालेले असल्याने त्यांनी भीमा कोरेगाव परिसरातील नागरिकांमध्ये जातीय तणाव निर्माण करण्यासाठी महार व मराठा समाजातील लोकांत तेढ निर्माण करण्याचा विखारी प्रयत्न केला. याची परिणीती १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या दंगलीत झाली. या दंगलीचे खरे सूत्रधार अद्याप मोकळे असणे हे खेदजनक आहे. 

पेशवाईचा पराभव भलेही १ जानेवारी १८१८ रोजी झाला असला तरी ती वेळोवेळी डोकं वर काढीत असते. पेशवाई पूर्वी मराठेशाहीचा मुखवटा घेऊन वावरायची. आता ती हिंदूत्वाचा (Hindutva) मुखवटा धारण करून वावरतेय.  तर कधी विरोधकांना देशद्रोही ठरविणाऱ्या राष्ट्रवादाचा मुखवटा घेऊन वावरते. ही नवी पेशवाई लोकशाहीला सुद्धा एक मुखवटा ठरविण्याचा प्रयत्न करू लागली आहे.

या नव्या पेशवाईत दलितांवरील, आदिवासींवरील व महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) दिवसा ढवळ्या दलित महिलांवर सामुहिक बलात्कार होत आहेत. हाथरससारख्या (Hathras) घटनेत तर मृत्यूनंतरही दलित महिलांची विटंबना थांबण्याचे नाव घेत नाही. बलात्कारींच्या बाजूने भाजप सरकार उभी असल्याचे जगाने पाहिले. नवपेशवाईतील दलित समाजावर होणारे अत्याचार पाहता, महाकवी नामदेव ढसाळांची (Namdev Dhasal) हि कविता आठवल्याशिवाय राहत नाही.

रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो 

तूमची आय-बहीण

आजही विटंबली जाते

हाटाहाटातून…

मवाल्यासारखे माजलेले

उन्मत्त नीरो

आजही मेणबत्तीसारखी जाळतात

माणसं

चौकाचौकातून…

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो,

किती दिवस सोसायची ही

घोर नाकेबंदी

मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?

नवी पेशवाई आपली नाकेबंदी करू पाहतेय, मनुस्मृती लादून पुन्हा युद्धकैदी करू पाहतेय.

हे आपण होऊ देणार नाही, असा संकल्प करू या. २०० वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांनी व भांडवलदारांनी पेशवाईचा पराभव केला. हे लक्षात ठेवून ही नवी पेशवाई भांडवलदारांशी जिगरी मैत्री करतेय.  त्यांच्या मांडीवर बसून देशावर राज्य करतेय. राजेशाहीच्या काळात एखाद्या वारसाला वा दत्तकाला गादीवर बसवून राज्यकारभार हाकला जायचा.  तसेच सध्या नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान पदाच्या गादीवर बसवून भांडवलदार राज्य करीत आहेत.

भारताच्या पश्चिम विभागात म्हणजे वेस्टर्न इंडिया आणि यात महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujrat), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhattisgarh) व गोवा (Goa) या राज्यांचा समावेश होतो. सध्या गरिबांना, शेतकऱ्यांना देशोधडीला लावून ज्यांच्या हितांसाठी मोदी सरकार काम करतेय ते सारे उद्योगपती म्हणजे एका अर्थाने ‘वेस्टर्न इंडिया कंपनी’ आहे. हे उद्योगपती व त्यांची वेस्टर्न इंडिया कंपनी ही ईस्ट इंडिया कंपनीचे जुळे बंधू आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) अपेक्षित असलेले हिंदूराष्ट्र म्हणजे भांडवलदारांच्या नफेखोरीसाठीचे राष्ट्र, असे आता म्हणावे लागतेय. या ‘वेस्टर्न इंडिया’ कंपनीमुळे व तिच्या मांडलिक  बगलबच्च्यांमुळे आज शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर उतरावे लागले आहे.

मोरासोबत फोटो काढायला वेळ असलेल्या पंतप्रधान मोदींकडे शेतकऱ्यांसोबत (Farmers) स्वतः बसून चर्चा करायला मात्र वेळ नाही. नवी पेशवाई आणि नव्या वेस्ट इंडिया कंपनीविरूद्ध  आपल्याला लढायचे आहे.  त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जात, धर्म व प्रांत विसरून एकत्र यावे लागेल.  मराठा विरूद्ध  महार किंवा कोणत्याही एका जातीविरूद्ध दुसरी जात अशी लढाई करून चालणार नाही. पुरोगामी विचारांच्या सर्वांना जाती धर्म विसरून एकत्र यावे लागेल.

न्यायाची, समतेची व देशाची लोकशाही जिवंत राखण्याची लढाई लढताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचा आदर्श आपण आपल्या डोळ्यापुढे ठेऊ या. आपल्याला हि लढाई विधायक आणि अहिंसक पद्धतीने लढावी लागेल. परिवर्तनवादी लढाई लढून हे युद्ध जिंकायचे आहे. या विजयाचा स्तंभ प्रत्येक मनामनात, प्रत्येकाच्या जीवनात उभा करायचा आहे. १ जानेवारीचे युद्ध जिंकणाऱ्या सर्व सैनिकांना आणि या जागेचा गौरव शौर्यस्थळ म्हणून करणाऱ्या बाबासाहेबांना हीच खरी  आदरांजली ठरेल!

(लेखक डॉ. नितीन राऊत हे महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here