कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: राज्यात आणि देशात भाजपचे सरकार हुकूमशाही पद्धतीने काम करत असून लोकशाही, संविधान संपुष्टात आणण्याचे काम सुरु आहे. भाजपाच्या या मनमानी कारभाराविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. पक्षाची भूमिका स्पष्ट असून या लढ्यासाठी जे पक्ष बरोबर येतील त्यांना एकत्र घेऊन लढा दिला जाईल, असे स्पष्टीकरण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (MPCC President Nana Patole) यांनी सोमवारी टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिले.

पटोले म्हणाले की, कोणाला काय वाटते आणि कोणाच्या मनात काय आहे, हा आमचा प्रश्न नाही, आम्ही काही पक्षांना बरोबर घेऊन लढत आहोत. त्यांचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. देश विकून देश चालवला जात आहे, शेतकरी, तरुणांना बरबाद केले जात आहे, महागाई, बेरोजगारीने जनता त्रस्त आहे. अशा परिस्थितीत भाजपाच्या विरोधात एकत्रित लढा दिला पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका असून जे पक्ष बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन लोकशाही व संविधान वाचवण्याचा लढा देऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिम्मत असेल तर

खारघर घटनेवर शिंदे सरकार सत्य लपवत असून सरकारकडून मृतांचा आकडाही जाहीर केला जात नाही. हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता सुरु होणार होता. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) उशिरा आल्याने तो ११.३० वाजता सुरु झाला. रणरणत्या उन्हात लाखो लोक बसले होते. या कार्यक्रमावर सरकारच्या तिजोरीतून १३ कोटी ८० लाखं रुपये खर्च करूनही लोकांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती. मात्र त्याचवेळी नेते व मंत्र्यांसाठी आलीशान वातानुकुलीत व्यासपीठ तयार केले होते. लाखो लोक पाण्यासाठी तडफडत असताना हे मंत्री, संत्री शाही भोजन झोडत होते, त्याचे फोटोही प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाले असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

खारघरमध्ये कार्यक्रम सुरु असताना पहिला मृत्यू १२ वाजता झाला तरीही कार्यक्रम सुरुच ठेवला. एवढा मोठा प्रकार घडूनही सरकारचे मंत्री, आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांनीच वेळ दिली होती असा आरोप करुन त्यांना दोषी ठरवत आहेत. या सरकारला जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी आम्ही मागणी केली होती. पण सरकारने एका आयएएस अधिकाऱ्याची चौकशी समिती नेमली असून केवळ धुळफेक करण्याचा प्रकार असून सरकारमध्ये हिम्मत असेल तर उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांकडून खारघर घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

…..शिंदे सरकारची राज्यभर पोलखोल…

खारघर घटनेने महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावयास लावली. परंतु राज्यातील सरकार मात्र त्याकडे फारसे गांभिर्याने पहात नाही. या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून सत्य परिस्थिती काय आहे हे जनतेला कळावे यासाठी प्रदेश काँग्रेसने आज राज्यभर सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेऊन शिंदे – फडणवीस सरकारची (Shinde – Fadnavis government) पोलखोल केली व खारघर घटनेतील सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

अदानीला जीएसटी माफ, गरिबांकडून मात्र लूट…  

मोदी सरकार उद्योगपती अदानीवर (Adani) मेहरबान आहे हे काही लपून राहिलेले नाही. आता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हस्तांतरणावर अदानी कंपनीला जीएसटी माफ करण्यात आलेला आहे. मोदी सरकार दूध, दही, आटा, शाळेचे साहित्य यावरही जीएसटी लावून सामान्य जनता, गरिब व शेतकऱ्यांकडून जीएसटी वसूल करते पण अदानीला मात्र जीएसटी माफ करते. मोदींच्या चष्म्यातून अदानी त्यांना गरिब वाटत असावेत म्हणूनच मोदींनी अदानीला जीएसटी माफ केला असावा, असा टोलाही पटोले यांनी यावेळी लगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here