@vivekbhavsar
नक्कीच मंत्रालयात जाणार
मुंबई: महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA government) सरकार लवकरच सत्तेतील दोन वर्षे पूर्ण करीत आहे. मात्र, अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजकारणापेक्षा फोटोग्राफीच्या जास्त प्रेमात आहेत. ‘तो’ प्रसंग अजूनही ते विसरलेले नाहीत. ते म्हणाले, …. जर सगळे मनासारखे घडले असते…. तर मी तुम्हाला (पत्रकारांना) माझ्या फोटो प्रदर्शनीला बोलावले असते.
दिवाळीनिमित्त (Diwali) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज “वर्षा” या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. राजकीय फटाके नंतर फोडू, आता दिवाळीत ते विषय नको, असे ठराविक उत्तर ठाकरे यांनी सर्व राजकीय प्रश्नांवर बोलतांना दिले. एकही राजकीय प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर दिले नाही.
फोटोग्राफी (Photography) या छंदावर बोलतांना उद्धव ठाकरे यांची कळी खुलली. ते म्हणाले, फोटोग्राफी करायला वेळच मिळत नाही. पूर्वी डिजिटल नव्हे तर फिल्मची फोटोग्राफी केली आहे.
सत्ता जुळवतांना भाजपने (BJP) वचन पाळले नाही, या त्यांच्या 2019 मधील दाव्याचा कुठलाही उल्लेख न करता ठाकरे म्हणाले, “जर सगळे मनासारखे घडले असते (अडीच वर्षे मुख्यमंत्री पद देण्याचे तथाकथित आश्वासन) तर मी (फोटोग्राफी करत राहिलो असतो) आणि तुम्हाला (पत्रकारांना) माझ्या फोटोग्राफी प्रदर्शनाला बोलवले असते”.
Also Read: परत या…परत या… मंत्रालयाचे मुख्यमंत्र्यांना साकडे
कलासक्त असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या मनातील खंत अनेकदा कुठे ना कुठे व्यक्त होत असते, तशी ती आज दिवाळीच्या मुहूर्तावर देखील झाली.
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सन 2019 च्या अशाच दिवाळी फराळाच्या वेळी पत्रकारांशी बोलतांना “आम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेण्याचे आश्वासन दिले नव्हते,” असे पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले होते. त्यांचे हेच वक्तव्य भाजप – शिवसेना युतीत (BJP – Shiv Sena alliance) बेबनाव करणारे ठरले आणि पुढे राजकीय इतिहास घडला.
नक्कीच मंत्रालयात जाणार
मुख्यमंत्री परत या या शीर्षकाखाली आज maharashtracity ने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात येणे पुन्हा सुरू करावे या आशयाचे मंत्रालय साद घालत असल्याचे ललित प्रसिध्द केले. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना उद्धव ठाकरे यांनी लवकरच मंत्रालयात जाणे सुरू करणार असल्याचे सांगितले. “काम होणे महत्वाचे आहे. मंत्रालयात जात नव्हतो तरी काम करत होतो. इथे (वर्षा) माझे कार्यालय आहे. इथे बसूनही मी काम करतो. मात्र आता लवकरच पुन्हा मंत्रालयात जाईल,” असे ठाकरे म्हणाले.