@maharashtracity

धुळे: राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिमव नागपूर या पाच जिल्हा परिषदांमधील 85 जागा तसेच या जिल्हा परिषदांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या १४४ जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागा आधी नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) यांच्यासाठी राखीव होत्या. आता या जागा सर्वसाधारण समजून निवडणूक होत आहे. हा अत्यंत अन्यायकारक व धोकादायक निर्णय आहे. हा निवडणूक कार्यक्रम रद्द करावा तसेच निवडणूक झालीच तर आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, या आशयाचे निवेदन भाजपाने जिल्हाधिकारी संजय यादव यांना दिले.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ.जयकुमार रावल, खा.डॉ. सुभाष भामरे, आ. काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज निकम, सुभाष देवरे, विरेंद्र गिरासे, किशो सिंघवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

भाजपाने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की समतेच्या तत्वानुसार ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय झाला. राज्यातील सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्यरीतीने बाजू मांडली नाही म्हणून न्यायालयाने ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सध्या रद्द केले आहे.

न्यायालयाने ओबीसींच्या आरक्षणाची संकल्पना नाकारलेली नाही तर केवळ त्याचे प्रमाण किती असावे हे ठरविण्यासाठी समर्पित मागास आयोग तयार करून ओबीसींचा इंपिरिकल डेटा मागितला आहे. राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करून पुन्हा ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत त्यांच्यासाठीच्या जागा सर्वसाधारण समजून निवडणुका घेणे अन्यायकारक आहे. त्यामुळे हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची व संबंधित जागांची पोटनिवडणूक न घेण्याची विनंती आहे, असेही निवेदनात नमूद केलेले आहे.

सध्या राज्यात करोनाची दुसरी लाट कमी होत असली तरी ती पूर्णपणे संपलेली नाही. तसेच तिसर्‍या लाटेचा धोका आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व इतर उच्च पदस्थांनी सांगितलेले आहे. अशा स्थितीत जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या काही जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबविणे अत्यंत धोकादायक आहे. निवडणूक प्रक्रियेच्या काळात प्रचारामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे. निवडणुकीमुळे करोनाची साथ पुन्हा पसरण्याचा धोका आहे. यामुळे लोकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल. यामुळे ही निवडणुक रद्द करावी. जर पोट निवडणुक झालीच तर निवडणुक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करु, असा इशारा भाजपाने दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here