@maharashtracity

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणूका ओबीसी प्रवर्ग सोडून होऊ नयेत यासाठी राज्य शासनाच्यावतीने इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात (OBC reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बाजू मांडण्यात येणार असल्याची, माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज येथे दिली.

आज कस्तुरबा गांधीमार्गस्थित महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) येथे भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. भुजबळ यांनी सांगितले, ओबीसी प्रवर्गाला सोडून निवडणुक होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi) 13 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात (SC) न्यामुर्ती ए.एम. खानविलकर यांच्या खंडपीठापुढे बाजु मांडणार आहेत.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने 4 मार्च 2021 ला निर्णय दिला होता. तरीही देशातील इतर राज्यांमध्ये झालेल्या न‍िवडणुकीमध्ये संबधित राज्यांनी ओबीसी प्रवर्गाला आरक्षण दिले होते. महाराष्ट्र राज्यानेही अध्यादेश (ordinance) काढून अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले होते.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक संस्थांच्या (local bodies) ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. या निणर्यामुळे ओबीसी प्रवर्गातील निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणुक लढविता येणार नाही. ओबीसी प्रवर्गातील पात्र उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी अपात्र ठरतील. असेही भुजबळ यांनी सांगितले.

जातनिहाय जनगणनेची माहिती (empirical data) जी भारत सरकारकडे उपलब्ध आहे, ती माहिती राज्य शासनास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी बाजु राज्य शासनाकडून सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येणार असल्याचे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here