By Sadanand Khopkar
Twitter : @maharashtracity
मुंबई: महाराष्ट्रात पहिल्यांदाच कोयना धरणात १० टीएमसी पेक्षा कमी पाणीसाठा आहे. पहिल्यांदाच ही परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे यापुढे कर्नाटकातून मागणी आली तरीही पाणी देता येणे कठीण आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, दक्षिणेकडील राज्यातून, विशेषतः गोवामार्गे राज्यात येणारा अवैध दारूसाठा ताब्यात घेण्यासाठी १३ अतिरिक्त तपासणी नाके निर्माण करण्यात येतील. गेल्या एक वर्षात आजवरचा सर्वात जास्त २१,५५० कोटी रुपयांचा महसूल आपल्या विभागाने राज्य तिजोरीत जमा केला आहे, असेही देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी अधिक प्रभावी होण्यासाठी सध्या असलेली अधिकारी -कर्मचारी बढती प्रकरणे निकाली काढण्यात येतील. त्यानंतर आवश्यक अशी नवी ७०५ पदे भरती प्रक्रिया सुरू करण्यात येतील. टाटा कन्सल्टन्सी कडे हे काम सोपविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मोहाच्या फुलांपासून तसेच स्ट्रॉबेरी पासूनही वाईन निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मान्यता देण्याचा विचार असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.