निमित्त ‘हिंदू एकता दिंडी’चे

दादर येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा हुंकार !

शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते, भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर सहभागी

@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबईसह महाराष्ट्रात व देशातही हिंदुत्व, भगवे वातावरण, हिंदुत्ववावरून (Hindutva) आरोप- प्रत्यारोप याला जोरदार उधाण आले आहे. हिंदुत्ववावरून मनसेचे नेते राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. तर याच हिंदुत्वावरून शिवसेना व भाजप एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहेत. मात्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू जनजागृती समिती व सनातन संस्थेने काढलेल्या निमित्त ‘हिंदू एकता दिंडी’मध्ये, एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेल्या शिवसेना व भाजपचे नेते, पदाधिकारी हे एकाच व्यासपीठावर आले.

फरक एवढाच होता की, शिवसेनेचे नेते दिवाकर रावते (Diwakar Raote) हे ‘हिंदू एकता दिंडी’च्या प्रारंभी उपस्थित होते. त्यावेळी, भाजपचे काही पदाधिकारीही उपस्थित होते. शिवसेनेचे महादेव देवळे (माजी महापौर) हे सेना भवन येथे दिंडीत सहभागी झाले होते. तर भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर (BJP MLA Kalidas Kolambkar) हे या दिंडीच्या समाप्तीप्रसंगी उपस्थित झाले होते.

वास्तविक, सनातन संस्थेचे (Sanatan Sanstha) संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त मुंबईतील कबुतर खाना ते दादर शिवाजी पार्क परिसरात शनिवारी ही ‘हिंदू एकता दिंडी’ काढण्यात आली होती.

यावेळी, उपस्थित सर्व हिंदूंनी पक्ष, जातीभेद यांना तिलांजली देऊन हिंदु राष्ट्र स्थापनेचा हुंकार दिला. या दिंडीमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हयांतील ५०० हून अधिक हिंदू बांधव सहभागी झाले होते.

सनातन संस्थेच्या सद्गुरू (सुश्री) अनुराधा वाडेकर, सनातन संस्थेच्या संत पू.(सौ.) संगीता जाधव, वसई (मेधे) येथील परशुराम आश्रमाचे संचालक भार्गवश्री बी.पी.सचिनवाला, गौड सारस्वत ब्राह्मण मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रवीण कानविंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

हिंदुत्वाचा एल्गार

‘हिंदू एकता दिंडी’ची सांगता शिवाजी पार्कजवळील चौकात झाली. यावेळी, शिवसेना आमदार दिवाकर रावते व भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी भाषण केले नाही.

सनातन संस्थेच्या धनश्री केळशीकर म्हणाल्या, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या आवाहनानंतर अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना एकत्र आल्या आहेत. हिंदु एकत्र येतात तेव्हा विश्वकल्याण साधले जाते. हिंदु राष्ट्राच्या (Hindu Nation) स्थापनेसाठी हिंदूंमध्ये एकता निर्माण व्हायला हवी, असे मत त्यांनी मांडले.

योग वेदांत सेवा समितीचे विनोद मिश्रा, हिंदु गोवंश रक्षा समितीचे दिप्तेश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे बळवंत पाठक आदी मान्यवर वक्त्यांनीही हिंदूसंघटनाची आवश्यकता अधोरखित करून एकत्रितपणे राष्ट्र आणि धर्मकार्य करण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here