योगींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार का?

शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना उपरोधिक सवाल

खारघर उष्माघात मृत्यू पकरण तापले

Twitter: @maharashtracity

मुंबई: खारघरमधील श्री सदस्यांच्या उष्माघाताने झालेल्या मृत्यूमुळे शिंदे सरकारवर कडाडून टीका करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिंदे यांची पाठराखण केली होती. उद्धव यांचे नाव न घेता कोरोना काळात राज्यात हलगर्जीपणा झाला होता आणि त्यासाठी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे वक्तव्य राज यांनी केले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उत्तर प्रदेशातील तरंगत्या प्रेतांची राज यांना आठवण करून दिली आहे. राज हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार का असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारला आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेत त्यांना टोला लगावला होता. मात्र, राज ठाकरे यांना शिवसेनेच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मुद्देसूद उत्तर देत राज ठाकरेंवर टिका घेतली. हे सर्व मुद्दे त्यांनी एका पत्र रुपाने पाठवले. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारनेच नव्हे तर जगभरात घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय न्यायालय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. धारावी पॅटर्न जगभर गाजला. असे असताना कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण  सुतोवाच करणार आहात का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे.

त्यांचे पत्र पुढील प्रमाणे…
प्रति श्री राज ठाकरे
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सस्नेह जय महाराष्ट्र!

वि. वि. पत्र लिहिण्यास कारण की, इंटरनेट आणि ई मेलच्या युगामध्ये आजही आपण पत्रलेखनासारखी आपली अत्यंत प्राचीन परंपरा जतन आणि संवर्धन करीत आहात त्यामुळे पत्राद्वारे हा संवाद आपल्याशी साधण्याचा प्रयत्न करत आहे.
खारघर दुर्घटनेच्या (Kharghar incident) संदर्भात किमान चार दिवसांनी का होईना काल आपण व्यक्त झालात हे एका अर्थी बरे झाले..!
घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यावर कोणीही राजकारण करू नये असे आपले म्हणणेही अगदी समायोचित आहे. पण पुढे आपण कोरोना काळात हलगर्जीपणा झाला वगैरे वगैरे असे म्हणत उध्दव साहेबांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची ही भाषा केली.
आपण अत्यंत सिलेकटीव्ह पद्धतीने व्यक्त झाला त्या संदर्भात काही प्रश्न उद्भवतात आणि ते विचारलेच पाहिजेत असे वाटते.

दादा,
(हे संबोधन दहशतीवाला दादा या अर्थाने नाही तर मोठा भाऊ या अर्थाने वापरले आहे)

मुद्दा क्रमांक एक : कोरोना महामारी (corona pandemic) ही उद्धव ठाकरे निर्मित नाही तर निसर्गनिर्मित होती हे आपल्याला ज्ञात असेलच.
पण खारघरमध्ये घडलेली दुर्घटना ही मानवनिर्मित आहे कृपया याची नोंद घ्यावी.

मुद्दा क्रमांक दोन : भारतरत्नसारखा पुरस्कार एका हॉलमध्ये दिला जातो आणि त्याचे प्रक्षेपण जगभर केले जाते. तर महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी (Maharashtra Bhushan Award) एवढी मोठी गर्दी आणि सभेची गरज होती काय? गर्दीचे प्रशासकीय नियोजन का केले गेले नव्हते?

मुद्दा क्रमांक तीन : श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेत मुळात ही गर्दीच राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिंदे – फडणवीस सरकारने एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. तर याचे राजकारण करू नका असे म्हणणे कितपत संयुक्तिक ठरते.

मुद्दा क्रमांक चार : कोरोना काळात मुख्यमंत्री निधीला सहाय्यता देण्याच्या ऐवजी खाजगी पीएम केअर फंडमध्ये निधी द्या असे म्हणणारे श्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोरोना काळात राजकारण करत नव्हते का?

मुद्दा क्रमांक पाच : गर्दी टाळणे हाच मोठा उपाय असताना सुद्धा मंदिरे उघडलेच गेले पाहिजेत यासाठी सुपारीबाज लोकांना पुढे करून राज्यातली एकूण व्यवस्था अस्थिर करण्याचा प्रयत्न करणारे भाजपाई नेते राजकारण करत नव्हते का ?

मुद्दा क्रमांक सहा : सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे बंद असताना, जशी मंदिरे बंद होती, वारी बंद होती तशी आंबेडकरजयंती सुद्धा साजरी झालीच नव्हती. पण मंदिरेच कशी बंद राहिली अशी आवई उठवत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांना एवढ्या गंभीर काळामध्ये सहकार्य करायचे सोडून त्यांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न करणारे भाजप नेते राजकारण करत नव्हते का ? 

असू द्या दादा, मी आपल्याला फार अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार नाही. पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आपल्या पक्षातल्या देशपांडे नावाच्या एका कार्यकर्त्याला साधे खरचटलेही नव्हते तरी सुद्धा आपण काय तातडीने रुग्णालयाकडे धाव घेतली. बापरे, आपली ती शून्यात हरवलेली नजर माध्यमे वारंवार दाखवत होते. दादा, खारघरच्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकाला आपण असेच धावत-पळत भेटायला गेलात का नाही?

शेवटचा मुद्दाः कोरोना काळामध्ये माजी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या कामाची दखल फक्त भारतात नाही तर जगभरात घेतली गेली. आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दस्तूर खुद्द पंतप्रधान मोदीजींनी सुद्धा श्री उद्धव ठाकरे यांच्या कोरोना कामगिरीचे कौतुक केले. ’’धारावी पॅटर्न‘‘ (Dharavi Pattern) तर जगभर गाजला.

या उलट कोरोना काळात उत्तर प्रदेशमध्ये मात्र गंगा नदीवर प्रेतं तरंगलेली उभ्या जगाने पाहिली. प्रेतांची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यामुळे कोरोनाचा फैलाव उत्तर प्रदेशमध्ये अधिक प्रमाणात झाला. हा हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात आपण काही सुतोवाच करणार आहात का?
असो, आपल्या मनात नसला तरी बहीण म्हणून माझ्या मनात कायमच स्नेहभाव आहे वृद्धिगंत व्हावा.

आपली बहीण
सुषमा अंधारे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here