By Sadanand Khopkar
@maharashtracity
कुसुमाग्रज नगरी, नाशिक- (मुख्य मंडप)
इथे आठ पुरूष मला बोलू देत नाहीत. पण माझ्या रुपात आठ अदृश्य स्त्रिया येथे आहेत, त्यांच्या वतीने मी बोलणार आहे. भीती स्वागतार्ह आहे, पण ती दमनातून आलेली नसावी, असे प्रतिपादन नांदेडच्या (Nanded) कवयित्री सुचिता खल्लाळ (Suchita Khallal) यांनी ‘संवाद लक्ष्यवेधी कवींशी’ या परिसंवादात सहभागी होताना येथे केले.
मनमाड येथील ज्येष्ठ कवी खलिल मोमीन (Khalil Momin) यांनी कविता करताना शब्दांचं गांभीर्य हवे, कविता असो वा गझल, गांभीर्याने शब्दांत ओवायची असते, असे विचार मांडले.
कवयित्री खल्लाळ म्हणाल्या, कविता लिहीताना संयमाने, विवेकाने रास्त अपेक्षा पूर्ण करणारा मजकूर लिहावा लागतो. कविता कधीही धर्म, राज्य, अर्थसत्तेच्या अधिन होता कामा नये. माझ्या कवितेला स्त्रीवादी कविता म्हणू नका. स्त्री कवयित्रीने बुद्ध, चार्वाक यांची नावे का घ्यायची नाहीत असा सवालही त्यांनी केला.
कवी व अभिनेते सौमित्र (Saumitra) म्हणाले, कविता म्हणजे, स्वत:च्या आत उतरत जाणे. जे आसपास घडते ते साहित्यात उतरले पाहिजे. आज आजुबाजूला सतत भिती जाणवते, पूर्वी गर्दीला चेहरा असायचा, आज तो नाही.
कवी संदीप खरे (Sandeep Khare) म्हणाले, कविता आणि गीतलेखन एकच प्रकार आहे. तर कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी आज जीवनात लालसा, हाव वाढत आहे, याबाबत चिंता व्यक्त केली. कवितेशी जोडले जाणे महत्त्वाचे असे स्पष्ट केले.
डॉ.पृथ्विराज तौर आणि डॉ.गोविंद काजरेकर यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले.