Twitter : @maharashtracity
मुंबई: खार पश्चिमकडील कोळीवाड्यात हरिश्चंद्र बेकरीमध्ये गॅस गळतीने आग लागली. सकाळी पावणे नऊ ते नऊ वीस पर्यंतच्या काळात पालिकेकडे या प्रसंगाची दोन वेळा माहिती देण्यात आली. येथील गॅस गळतीमुळे सहा जण गंभीर भाजले असून त्यांच्यावर वांद्रे भाभा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले.
खार पश्चिमेकडील गोविंद पाटील मार्गावर खारदांडा येथील बेकरीमध्ये ही आग गॅस गळतीमुळे लागली. पावणे नऊ ते नऊ वीस अशा पाऊण तासाच्या आगीच्या भडक्यात एकूण सहा रहिवाशी भाजले. यात सखुबाई जैस्वाल (६५) या ४५ टक्के भाजल्या. तर प्रियंका जैस्वाल (२६) ही मुलगी ५१ टक्के भाजली आहे. तसेच निकिता महाडिक (२६) ही ४५ टक्के भाजली आहे. तर सुनिल जैस्वाल (२९) ५० टक्के भाजला आहे. यश चव्हाण हा ७ वर्षाचा मुलगा ४० टक्के भाजला आहे. तर प्रथम जैस्वाल हा ६ वर्षाचा मुलगा ४५ टक्के भाजला आहे. सर्व प्रौढ जखमी रुग्ण आयसीयू विभागात दाखल असून दोन लहान मुलांना लहान मुलांच्या आयसीयू वॉर्डात उपचार सुरु असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
यावर बोलताना उपनगरीय पालिका रुग्णालय प्रमुख डॉ. विद्या ठाकूर म्हणाल्या कि, जखमी रुग्णावर तातडीचे उपचार सुरु असून रुग्ण ४५ ते ५० टक्के भाजले आहेत. यातील दोन प्रौढ रुग्ण ऐरोली बर्न रुग्णालयात, दोन लहान मुले कस्तुरबा रुग्णालयात तर उर्वरित दोघे जण वांद्रे भाभा रुग्णालयात आयसीयू वॉर्डात उपचार घेत आहेत.