पालिका आरोग्य विभागाचा साप्ताहिक अहवाल
@maharashtracity
मुंबई: मुंबईत पावसाळी आजार पुन्हा वाढू लागले आहेत. पालिकेच्या साप्ताहिक अहवालानुसार मुंबईत सध्या डेंग्यू आणि एच१एन१ चे रुग्ण वाढत आहे. नुकतेच या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आले होते. मात्र आता हे आजार पुन्हा वाढू लागल्याने पालिकेच्या चिंतेत भर पडली आहे.
मुंबईत ९ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. नऊ दिवसात मलेरियाचे १२० रुग्ण, लेप्टोचे १८ , डेंग्यूचे ७८, गॅस्ट्रोचे ७७, हेपेटायसिसचे ९, चिकनगुनियाचे ० तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ६ रुग्णांची नोंद झाली होती. ९ ते १६ ऑक्टोबरपर्यंत ७ दिवसांत मलेरियाचे १७७ रुग्ण, लेप्टोचे ३१, डेंग्यूचे १७८, गॅस्ट्रोचे १६१, हेपेटायसिसचे १९, चिकनगुनियाचे १ तर एच१एन१ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे.
सध्या ताप, खोकला, घशात खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, डायरिया, उलटी अशी लक्षणे असलेल्या नागरिकांनी त्वरित उपचार करून घ्यावेत. शिंकताना आणि नाक पुसण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकून घ्यावे. हात साबणाने पाण्याने स्वच्छ धुवावेत. डोळे नाक आणि तोंड यांना हात लावू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. मोठ्या प्रमाणात ताप आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्वचा, ओठ निळे पडल्यास त्वरित पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घ्यावे, अन्यथा त्यांचा मृत्यू होऊ शकतो असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.